पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील एका खासगी शाळेच्या शिक्षकाने केलेल्या मारहाणीत ९ वर्षाच्या दलित विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. पीडित मृत विद्यार्थ्याचे नाव इंद्रकुमार मेघवाल असे असून तो संबधित खासगी शाळेत इयत्ता ३ री मध्ये शिकत होता. शिक्षकांसाठी ठेवण्यात आलेल्या माठातून विद्यार्थ्याने पाणी पिल्याने त्याला शिक्षकाकडून मारहाण करण्यात आली होती. दलित विद्यार्थ्याच्या या हत्येनंतर राजस्थानमध्ये राजकारण ढवळून निघाले आहे. यानंतर भाजपकडून मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षक छैलसिंहला ताब्यात घेतले आहे. (Rajasthan)
२० जुलैला इंद्रकुमारने शिक्षकांसाठी ठेवलेल्या माठातून पाणी पिले होते. इंद्रकुमारच्या वडिलांनी आरोप केला आहे की, माठाला हात लावल्यामुळे छैलसिंह यांना राग आला आणि त्यांनी इंद्रकुमारला मारहाण केली. त्यानंतर इंद्रकुमारला स्थानिक रुग्णालयातील डॉक्टरांनी जालोर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. मात्र इंद्रकुमारच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. शनिवारी (दि. १३ ऑगस्ट) त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर इंद्रकुमारच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Rajasthan)
शिक्षकाकडून झालेल्या मारहाणीनंतर इंद्रकुमारवर कुटुंबीयांकडून वेगवेगळ्या रूग्णालयात २३ दिवस उपचार सुरू होते. दरम्यान, शनिवारी १३ ऑगस्ट रोजी इंद्रकुमारचा मृत्यू झाला.
दलित विद्यार्थ्याच्या हत्येनंतर भाजप नेत्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया, राज्यसभा सदस्य डॉ. किरोडी लाल मीणा या भाजप नेत्यांनी ट्वीट करत सरकारवर हल्ला बोल केला आहे. भाजपने आरोप केला आहे की, काँग्रेस पक्ष जातीवादाला खतपाणी घालत आहे.