![काँग्रेसच्या भारत जोडो यात्रे दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन यांनी आपला सहभाग नोंदवला होता. ( संग्रहित छायाचित्र )](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F01%2Frahul-gandhi-and-kamal-hasan.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस पक्षाच्या वतीने देशातील विविध राज्यात सुरु असणार्या भारत जोडो यात्रेत नुकताच दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन यांनी आपला सहभाग नोंदवला होता. ही यात्रा मंगळवारपासून (दि. ३) पुन्हा उत्तर प्रदेशमधून सुरु होणार आहे. यापूर्वी एक दिवस आधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अभिनेता कमल हसन यांच्याबरोबर भारतीय राजकारण आणि संस्कृतीवर चर्चा केली. या चर्चेची व्हिडीओ क्लिप राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ( Rahul Gandhi and Kamal Haasan )
या चर्चेची सुरुवात करताना राहुल गांधी हे कलम हसन यांना म्हणाले की, सध्या देशात काय चालले आहे याबद्दल तुमचे मत जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. यावर कमल हसन म्हणतात, "आज देशात जे काही घडत आहे त्याबद्दल बोलणे हे माझे कर्तव्य समजतो. मला वाटले भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून रक्त आणि घामाने माखलेल्या रस्त्यावरून तुम्ही चालत आहात." यावेळी कमल हसन यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या कार्याचे स्मरणही केले.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, युक्रेनमध्ये जे घडले ते संपूर्ण जगाने पाहिले आहे. युक्रेनचे पाश्चात्य देशांशी सखोल संबंध असावेत. अशी आमची इच्छा नाही. असे झाल्यास, आम्ही तुमचा भूगोल बदलू अशी धमकी रशियाने दिली होती. भारताबाबतही आपण नेमके हेच पाहू शकतो. आपला देश अंतर्गत समस्यांना तोंड देत आहे, हे चीनला माहित आहे. त्यामुळेच तो सीमेवर बेंधूंदपणे वागत आहे. चीन आपल्याला अप्रत्यक्षपणे तुमचा भूगोल बदलू, असे सांगत आहे. एक भारतीय असल्याने मी पाहतोय की, चीन रशियासारखाच तळ तयार करत आहे. म्हणूनच मी माझ्या देशाला सतर्क करू इच्छितो, असेही राहुल गांधी म्हणाले.
या वेळी राहुल गांधींनी कमल हसन यांना वाघाचे पाणी पितानाचा एक फोटो भेट म्हणून दिले. प्रियंका गांधी यांचा मुलगा रिहान याने हा फोटो काढला होता. या फोटोवर प्रतिक्रिया देताना कलम हसन म्हणाले की, मला भेट देण्यात आलेला फोटो हा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सांगतो. हे चित्र दाखवते की, तुम्ही महान भारतीय आणि चॅम्पियन आहात.
24 डिसेंबर रोजी दिल्लीला पोहोचलेल्या भारत जोडो यात्रेत कमल हसन सहभागी झाले होते. राहुलसोबत चर्चा करतानाही दिसले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते की, 'मी एक भारतीय म्हणून या यात्रेत सहभागी झालो आहे. माझे वडील हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. मात्र माझी वेगळी विचारसरणी होती. मी माझा स्वतःचा राजकीय पक्षही स्थापन केला; पण जेव्हा मी देशाचा विचार करतो तेव्हा राजकीय पक्षांच्या रेषा पुसट होतात."
भारत जोडो यात्रेत सामील झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कमल यांनी मातृभाषा हा आपला जन्मसिद्ध हक्क असल्याचे म्हटले होते. इतर भाषा शिकणे आणि वापरणे ही वैयक्तिक आवडीची बाब आहे. गेल्या 75 वर्षांपासून हा दक्षिण भारताचा हक्क आहे. इतरांवर हिंदी लादणे मूर्खपणाचे आहे, असेही त्यांनी नमूद केले होते.
हेही वाचा :