नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा बुधवारी (दि.०३) जंतरमंतरवर विरोध करणाऱ्या कुस्तीपटूंना भेटण्यासाठी पोहोचल्या. पीटी उषा यांनी आंदोलक पैलवानांशी संवाद साधला. कुस्तीपटू गेल्या ११ दिवसांपासून आंदोलन करत असून, त्यांची सरकारशी कोणतीही चर्चा झालेली नाही. यावेळी पीटी उषा यांनी कुस्तीपटूंना त्यांचे धरणे आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले. याआधीही पीटी उषा म्हणाल्या होत्या की, कुस्तीपटूंनी असा विरोध करू नये. अशाने देशाची प्रतिमा मलीन होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या भेटीसंदर्भात कुस्तीपटू बजरंग पुनियाने माहती देताना सांगितले की, पी. टी. उषा यांनी मी तुमच्या खेळाडूंसोबत उभा आहे आणि तुम्हाला न्याय मिळवून देईन. आधी मी अॅथलीट आहे आणि मग आणखी काही, असे देखील तिने स्पष्ट केले. ती आमच्या समस्यांकडे लक्ष देऊन आहे, यावर लवकरच तोडगा काढू, असे आश्वासन पी.टी.उषा यांनी दिल्याचे बजरंग पुनिया याने सांगितले. मात्र जोपर्यंत ब्रृजभूषण तुरुंगात जात नाहीत तोपर्यंत ते आंदोलनस्थळ सोडणार नसल्याचे पुनिया यांनी सांगितले.