शिरुर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत शिरूर मध्ये पोपटराव गावडे हे साहेबांचे उमेदवार तर बाबुराव पाचर्णे हे अजीत पवार यांचे उमेदवार असा प्रचार केला जात होता. मात्र त्यावेळेसही मी आणि साहेब वेगळे नव्हतो आणि आजही आम्ही वेगळे नसल्याने कुणीही काळजी करण्याची गरज नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
शिरूर-हवेलीचे दिवगंत आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने तर्डोबाची वाडी (ता.शिरूर) येथे त्यांचे स्मारक उभाण्यात आले आहे. अजित पवार यांनी या स्मारकाचे लोकार्पण करुन अभिवादन केले, त्या वेळी ते बोलत होते.
आमदार बाबुराव पाचर्णे हे तळमळीने व सच्चेपणाने काम करणारे लोकसेवक होते. तर्डोबावाडी येथील पाचर्णे यांचे स्मारक सर्वसामान्यांना व कार्यकर्त्याना प्रेरणा देणारे राहील असे अजित पवार म्हणाले.
यावेळी पाचर्णे यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, मालती पाचर्णे, कर्नल महेश शेळके, राणी शेळके, बी. जी. पाचर्णे, माजी मंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार नीलेश लंके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रदीप वळसे, शिरुर आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, भाजपाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक नितीन पाचर्णे, जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष निवृती अण्णा गवारी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रशेखर पाचुंदकर, प्रा.डॉ. राजेराम घावटे उपस्थित होते.
हेही वाचा