पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी देशाच्या विकासपर्वासह २०४७ पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र घडविण्याची सरकारची योजना मांडली. ( PM Modi's Independence Day Speech ) आपल्या ९० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या १५ मंत्रांविषयी जाणून घेवूया…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त आझाकी का अमृत महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी पंतप्रधानांनी अमृत कालाची तुलना कर्तव्य काळाशी केली होती. यानंतर लाल किल्यावरुन बोलताना त्यांनी याचा पुन्नरुच्चार केला. आज देशासाठी घेण्यात येणारे निर्णयांचे फळ एक हजार वर्षांनंतर मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देश २०४७मध्ये स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा कारणार आहे. भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी 2047 चे लक्ष्य निर्धारित करताना पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करताना देशाच्या आकांक्षा पूर्ण होतील याची खात्री करण्यासाठी पुढील पाच वर्षे महत्त्वपूर्ण असतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
भारताची लोकसांख्यिकीय शक्ती, लोकशाही आणि विविधतेसह, विकासाच्या प्रवासाला सामर्थ्यवान कसे मदत करू शकते हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या तिघांच्या अभिसरणातून देशाची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात, असेही ते म्हणाले.
देशाला प्रथम स्थान देणे हा त्यांच्या सरकारच्या प्रत्येक निर्णयाचा आधार बनतो. करदात्यांच्या पैशाचा एक-एक पैसा त्यांच्या कल्याणासाठी वापरला जाईल हे सुनिश्चित करणे हे केंद्राचे उद्दिष्ट आहे, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
देशाच्या विकासामध्ये अडथळे असणार्या भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण या दुष्कृत्यांचा नायनाट करणे आवश्यक आहे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात देशवासीयांना तीन हमी दिल्या. देश पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असल्याची खात्री करण्यासाठी, घरे बांधण्यासाठी सुलभ कर्जे उपलब्ध करणे आणि कमी खर्चात औषधांसाठी २५ हजार जन औषध केंद्रे स्थापन करण्याचा मानसही त्यांनी या वेळी जाहीर केला.
ग्रामीण भागातील विकास आणि कल्याणकारी उपाययोजनाबाबत महिला बचत गटांच्या भूमिकेचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, आता महिलांचे सक्षमीकरण करून '२ कोटी लखपती दीदी' बनवणे हे त्यांचे ध्येय आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार पावले उचलणार असल्याचे ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
देशाच्या सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारची धोरणे स्पष्ट आहेत. आमचा हेतू स्वच्छ आहे. सर्वांचे कल्याण सुनिश्चित करण्याचे धोरणच आपल्याला विकसित राष्ट्र बनण्यास मदत करू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रादेशिक भाषांमध्ये उच्च शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी केंद्र पावले उचलत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. प्रादेशिक भाषांमध्ये न्यायालयाचे निकालांचा उपलब्ध करून दिल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा प्रारंभच मणिपूरमधील अशांततेवर तोडगा काढण्याचे आश्वासन देऊन केली. ईशान्येकडील राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.
केंद्र सरकारने सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे, सहकारातून सहकार्याकडे हळूहळू वाटचाल करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आणखी वाढवण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
केंद्र पुढील महिन्यात पारंपारिक कौशल्य असलेल्यांसाठी किमान १३ हजार कोटींच्या निधी वाटपासह 'विश्वकर्मा योजना' सुरू करेल. ही योजना पारंपरिक उद्योगातील कुशल कामगारांवर लक्ष केंद्रित करणार असल्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली.
कोरोना महामारीच्या काळात भारताने इतर देशांना मदत केली. भारत हा जगाचा मित्र आहे जो फक्त स्वतःचा विचार करत नाही. कोविडनंतर भारताने 'वन अर्थ, वन हेल्थ' या दृष्टिकोनाचा त्यांनी पुरस्कार केला.
२०१४ मध्ये देशवासीयांनी संधी दिली. तसेच २०१९ मध्ये पुन्हा आपल्या विश्वास दाखवला, याबद्दल आभार व्यक्त करत आता जनतेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असेल तर ते पुन्हा लाल किल्ल्यावर परततील आणि पुढील वर्षी देशाला संबोधित करतील, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
आपल्या भाषणाच्या समारोप पंतप्रधानांनी एक छोटीशी कविताही शेअर करुन केला. या ओळींनी देशासाठी त्यांच्या सरकारची योजना मांडली आणि आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि भारताला जगभरात नावाजलेले बनवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :