पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने २०१९ मधील जम्मू-काश्मी राज्याला विशेषाधिकार बहाल करणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज ( दि.११) कायम ठेवला आहे. या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X अकाऊंटवरून पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. (PM Modi On Article 370)
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आपल्या पाेस्टमध्ये म्हटलं आहे की, " हा केवळ कायदेशीर निकाल नाही, तर जम्मू काश्मीरमधील जनतेसाठी हा एक आशेचा किरण आहे. ३७० रद्द निकालाबाबतचा हा निर्णय येथील उज्वल भविष्याचे वचन आहे. तसेच एक मजबूत, अधिक अखंड भारत निर्माण करण्याच्या आपल्या सामूहिक संकल्पाचा हा दाखला आहे." (PM Modi On Article 370)
जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आज (दि.११) सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. संजय किशन कौल, न्या. संजीव खन्ना, न्या. बीआर गवई आणि न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. या प्रकरणी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सलग १६ दिवस सुनावणी झाली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ५ सप्टेंबर २०२३ रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आम्ही असे मानतो की कलम ३७० ही तात्पुरती तरतूद आहे. राज्यातील युद्ध परिस्थितीमुळे ते तात्पुरते कारणासाठी होते. त्यामुळे कलम ३७० रद्दचा निर्णय आम्ही कायम ठेवत असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
कलम ३७० रद्द करण्याबाबतचा भारतीय संसदेने ५ ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मकदृष्ट्या कायम ठेवला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा आजचा हा निकाल ऐतिहासिक आहे. हा निर्णय जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील आपल्या बहिणी आणि भावांच्या आशा, प्रगती आणि एकतेच्या दृष्टीने आशादायक घोषणा आहे. न्यायालयाने प्रगल्भतेने आपला निर्णय देत, देशाच्या एकतेचे मूलतत्त्व दृढ केले आहे. भारतीय म्हणून या निर्णयाचे कदर करा, असेही पीएम मोदी म्हणाले. (PM Modi On Article 370)
मी जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या संयमी लवचिकता असलेल्या जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की, तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आमची वचनबद्धता कायम आणि अटळ आहे. देशातील प्रगतीची फळे केवळ तुमच्यापर्यंतच पोहचवणे नाही तर कलम ३७० मुळे यातना भोगलेल्या समाजातील सर्वात असुरक्षित आणि उपेक्षित घटकांपर्यंत त्यांचे लाभ पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे, असेही पीएम मोदी यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.