नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे नाव बदलण्याच्या तसेच चित्रपट प्रदर्शनास स्थगिती देण्याच्या विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. या निकालामुळे शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना दिलासा मिळाला आहे.
गंगूबाई काठियावाडी यांच्या जीवन संघर्षावर आधारित असलेल्या या चित्रपटावर गंगुबाई यांच्या कुटुंबियांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या नावावरच कुटुंबीयांनी आक्षेप घेत नाव बदलण्याची मागणी केली होती. यावर अखेरच्या क्षणी नाव बदलता येणे शक्य नाही, अशी भूमिका निर्मात्यांनी घेतली होती.
गंगूबाई यांचा दत्तक पुत्र असल्याचा पुरावा नसल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले. २०११ साली जेव्हा गंगुबाई यांच्या जीवनावरचे पुस्तक प्रकाशित झाले. त्यावेळी त्याला कोणीही आक्षेप घेतला नव्हता, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
याचिकाकर्त्यांनी अद्याप चित्रपट बघितलेला नाही तसेच चित्रपटात गंगुबाई यांचा कुठेही अपमान करण्यात आलेला नाही, असा युक्तिवाद भन्साळी प्रोडक्शनच्या वतीने ॲड. अर्यमा सुंदरम यांनी केला. गंगुबाई यांचे चरित्र अथवा त्यांच्या प्रतिमेला धक्का देण्यात आला नसून उलट एका महिलेच्या संघर्षाची कहाणी चित्रपटात आहे, असेही भन्साळी प्रोडक्शनकडून सांगण्यात आले.