पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-20 विश्वचषक स्पर्धा १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, भारत-पाकिस्तान यांच्यातील हायव्होलटेज सामना २३ ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये होणार आहे. या सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागून राहिल्या आहेत. चाहत्यांना पुन्हा एकदा दोन्ही संघांमधील चुरशीचा सामना पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
पाकिस्तान संघातील मोहम्मद रिजवान आणि भारत संघातील सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) फूल फॉर्मात आहेत. आयसीसी टी-20 क्रमवारीत मोहम्मद रिझवान पहिल्या स्थानावर आहे, तर सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही खेळाडू सातत्याने चमकदार फलंदाजी करत आहेत. दोन्ही संघाचे ते मुख्य आधारस्तंभ राहिले आहेत. सूर्यकुमार हा जगातील नंबर वन टी-20 फलंदाज बनला होता. पण रिजवानने त्याच्याकडून नंबर वनची खुर्ची हिसकावून घेतली.
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या तिरंगी मालिकेत बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात धमाकेदार खेळ केल्यानंतर मोहम्मद रिजवानने सूर्यकुमार यादवचे कौतुक केले आहे. रिजवान म्हणाला, सूर्यकुमार यादवची खेळण्याची पद्धत मला खूप आवडते. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल रिजवान म्हणाला, नक्कीच भारत-पाकिस्तान सामना हा दबावाचा असतो, त्यामुळे मी प्रत्येक गोष्टी सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण संघात भारत पाकिस्तानमधील सामन्याचे तणावपूर्ण वातावरण आहे. पण हा विश्वचषकातील सामना आहे. त्यामुळे तो आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.
हेही वाचलंत का ?