नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : रामनवमीच्या दिवशी अनेक राज्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (ओआयसी-Organisation of Islamic Cooperation) वक्तव्यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ओआयसीच्या टीकेवर टीका केली आणि म्हटले की यातून त्यांची सांप्रदायिक आणि भारतविरोधी विचारसरणी दिसून येते.
MEA चे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, "आम्ही याचा तीव्र निषेध करतो, ओआयसी सचिवालयाचे विधान त्यांची सांप्रदायिक मानसिकता आणि भारतविरोधी अजेंडा दर्शवते." अशी विधाने करून ओआयसी आपल्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवते. (OIC)
ओआयसीने रामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचाराला मुस्लिमांवरील संघटित हल्ला म्हणून संबोधले होते. ओआयसीने भारतातील वाढत्या इस्लामोफोबियाचे उदाहरण म्हणून रामनवमी दरम्यान हिंसाचारावर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले. संघटनेने मुस्लिमांचे हक्क आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितले.
रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराबद्दल ओआयसी महासचिव चिंतेत असल्याचे ओआयसीने म्हटले होते. भारतातील अनेक राज्यांमध्ये रामनवमीच्या मिरवणुकांमध्ये मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यात आले आहे. बिहार शरीफमध्ये ३१ मार्च रोजी मदरसा जाळण्यात आला होता. ओआयसीने भारतीय अधिकार्यांना अशा कृत्यांसाठी चिथावणी देणार्या आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आणि मुस्लिम समुदायाची सुरक्षा, हक्क आणि सन्मान सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. बिहारमधील नालंदा आणि रोहतास जिल्ह्यांमध्ये रामनवमीला जातीय हिंसाचार झाल्यापासून तणावाचे वातावरण आहे. हिंसाचारानंतर दोन्ही जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
ओआयसी(OIC : Organisation of Islamic Cooperation) ही एक इस्लामिक सहकारी संघटना आहे. या आंतरराष्ट्रीय संस्थेत ५७ राष्ट्रांचे सदस्य आहेत. ही संघटना मुस्लिम जगतातील देशांचे व त्यांच्या नागरिकांचे एकत्रित प्रतिनिधित्व करते व त्यांचे हिताला प्राधान्य देते.
हेही वाचा