नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : वन रँक, वन पेन्शन…योजनेद्वारे करण्यात आलेल्या धोकेबाजीनंतर आता मोदी सरकार ऑल रँक, नो पेन्शन…चा धोका, माजी सैनिकांना देत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सोशल मीडीयाद्वारे केला. सैनिकांचा अपमान हा देशाचा अपमान असून, माजी सैनिकांना सरकारने तात्काळ पेन्शन द्यावे, अशी मागणीही गांधी यांनी केली आहे.
ज्या माजी सैनिकांना गेल्या काही काळापासून पेन्शन देण्यात आलेले नाही, त्यात असंख्य थ्री-स्टार अधिकार्यांचा समावेश असल्याचे गांधी यांनी म्हटले आहे. असंख्य माजी सैनिकांना एप्रिल महिन्याचे पेन्शन अद्याप मिळालेले नसून, त्याचे कारणही अद्याप सरकारकडून सांगण्यात आलेले नाही. दर महिन्याच्या २९ किंवा ३० तारखेला पेन्शनची रक्कम माजी सैनिकांच्या बँक खात्यात जमा होत असते. दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या मुद्यात लक्ष घालून पेन्शनचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी काही माजी लष्करी अधिकार्यांनी केली आहे.