खासगीकरणाचा कोणताही विचार नाही; वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा : नितीन राऊत

खासगीकरणाचा कोणताही विचार नाही; वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा : नितीन राऊत
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्य वीज मंडळाच्या कोणत्याही कंपनीचे खासगीकरण होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी मंगळवारी दुपारी २ वाजता सर्व कामगार संघटनांच्या नेत्यांसोबत मंत्रालयात बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली जाईल, असे आश्वासन देत डॉ. राऊत यांनी प्रस्तावित संप मागे घेण्याचे आवाहन वीज कर्मचारी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना केले आहे.

वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संपाचा इशारा देणाऱ्या २७ वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी डॉ. राऊत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला असता, दीड महिन्यांपूर्वी संपाची नोटीस देऊनही वीज व्यवस्थापन व प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही संपावर जाण्याचा निर्णय घेतला, अशी भूमिका वीज कर्मचारी फेडरेशनचे कार्याध्यक्ष मोहन शर्मा यांनी मांडली. वीज ग्राहकांना वेठीस धरण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, वीज कंपनी व्यवस्थापनाच्या असंवेदनशील धोरणाला आमचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. शेतात शेतकऱ्यांची पिके उभी आहेत. त्यातच उष्णतेचा प्रकोपही वाढत चालला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्याची माझी तयारी आहे. कुठल्याही गोष्टीवर संवाद व चर्चेतूनच मार्ग निघतो.
तुम्ही बैठकीची वेळ निश्चित करा, शक्य असेल तर मंगळवारी मंत्रालयात दुपारी २ वाजता बैठक बोलावतो. मी एक पाऊल पुढे टाकले आहे. तुम्ही त्याला प्रतिसाद देऊन बैठकीला हजर रहा आणि संप मागे घ्या. संपावर जाऊन विरोधकांचा हेतू साध्य करू नका, असे राऊत म्हणाले. ऊर्जामंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी होणाऱ्या बैठकीला हजर राहून चर्चा करण्याला मान्यता दिली.

हेही वाचलंत का ?  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news