#OperationGanga :गेल्या २४ तासात १३०० भारतीयांची युक्रेनमधून सूटका

File Photo
File Photo

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : युक्रेनमधील बिघडलेली परिस्थिती लक्षात घेता तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढले जात आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत युक्रेनमध्ये अडकलेल्या भागातून 1300 हून अधिक लोकांना मायदेशी आणण्यात आले.

रशियाच्या लष्करी हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत तेथे अडकलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी भारताच्या बाजूने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज सांगितले की, भारताने गेल्या २४ तासांत युद्धग्रस्त युक्रेनमधून १,३७७ नागरिकांना बाहेर काढले आहे.

सोशल मीडियावर माहिती देताना परराष्ट्र मंत्र्यांनी लिहिले की, गेल्या २४ तासांत पोलंडहून आलेल्या पहिल्या विमानासह सहा उड्डाणे भारताकडे रवाना झाली आहेत. युक्रेनमधून आणखी 1377 भारतीय नागरिकांना परत आणण्यात आले.

युक्रेनमधील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन गंगा अंतर्गत, भारत पुढील तीन दिवसांत 26 हून अधिक उड्डाणे चालवत आहे. युक्रेनचे हवाई मार्ग बंद झाल्यामुळे भारतीयांना बाहेर काढण्यासाठी रोमानिया, हंगेरी, पोलंड आणि स्लोव्हाक रिपब्लिकमधील विमानतळांचा वापर केला जात आहे.

परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी काल पत्रकारांना सांगितले की, युक्रेनची राजधानी कीवमध्ये एकही भारतीय शिल्लक नाही.

रशियाने अनेक शहरांमधील नागरी भागांवर हल्ले सुरू केले आहेत आणि कीव रहिवाशांना त्यांच्या घरातून पळून जाण्यास सांगितले आहे. उपग्रहावरुन मिळालेल्या प्रतिमांमध्ये कीवकडे जाणाऱ्या रस्त्यांवर रशियन सैनिकांचा एक लांब काफिला दाखवतात. शेकडो टाक्या, तोफखाना, आर्मर्ड आणि लॉजिस्टिक असलेली वाहनेदेखील असू शकतात, जी वेगाने कीवमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news