![येवला : कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत व प्रमुख ३० कार्यकर्त्यांसोबत येवला तालुका पोलीस स्टेशन येथे बैठकीत उपस्थित जलहक्क संघर्ष समितीचे पदाधिकारी. (छाया : अविनाश पाटील)](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F06%2F%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा
देवदरी येथील "देवनाचा" सिंचन प्रकल्पापुढील अडचणी तातडीने सोडवा, अन्यथा संघर्ष अटळ आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी गुरुवारी (दि.29) मुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा करत असताना मुंबईत आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर या प्रकल्पाबाबत लाभ क्षेत्रातील गावातील जनतेचे प्रबोधन करण्यासाठी जलहक्क संघर्ष समितीने गावोगावी जल संकीर्तन परिषदा आयोजित केल्या आहेत.
देवनाचा सिंचन प्रकल्पासमोरील अडचणी, सद्यस्थिती आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका या विषयांवर लाभ क्षेत्रातील गावातील जनतेचे प्रबोधन करण्यासाठी देवदरी येथे पहिली जल संकीर्तन परिषद झाली. यावेळी १२ व्या शतकात ज्ञानेश्वरांनी मांडलेले, जल जंगल आणि जमीन याविषयी दूरदर्शी विचार समजून सांगण्यात आले .
त्यासाठी नगरेची रचावी । जलाशये निर्मावी ।। महावने लावावी । नानाविध ।। या ज्ञानेश्वरीतील १४ व्या अध्यायातील ३३ व्या ओवीचा आधार घेतला.
येवला तालुक्यातील तालुक्यातील शेती सिंचनासाठी लागणारे पाणी, सिंचन व्यवस्था, साठवण बंधारे, कालव्याचे पाणी, पेय जल आदी बाबी गांभीर्याने न पाहिल्याने पाणी, जमीन, वन, पर्यावरण याविषयी गंभीर समस्या तयार झाल्या आहेत. येत्या काळात पाण्यावरून श्रीमती मोजली जाणार आहे. सरकार दरबारी आपल्या मागण्या रेटून जलसमृद्ध व्हावे, असे प्रतिपादन जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांनी केले. देवनाचा सिंचन प्रकल्प समितीमध्ये २३७७ सदस्य असून अप्रत्यक्ष लाभार्थी म्हणून किमान १० हजार शेतकरी, कष्टकरी, भूमिहीन, आदिवासी मत्सव्यावसायिक आहेत. यातील ९० टक्के लाभार्थी हे अशिक्षित अथवा अल्प अशिक्षित आहेत. त्यामुळे त्याच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून, प्रकल्पासमोरील अडचणी, सद्यस्थिती आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका या विषयांवर लाभ क्षेत्रातील गावातील जनतेचे प्रबोधन केले जात आहे. येवला तालुक्यातील रहाडी, खरवंडी, देवदरी हे प्रत्यक्ष लाभार्थी तर कोळम खुर्द, कोळम बुद्रुक, भारम येथील प्रत्यक्ष लाभार्थीं, तसेच वनसंवर्धन राखीवमुळे सिंचन प्रकल्प अडचणीत आले आहेत त्या गावात ममदापूर, राजापूर, कोळगाव, वाई बुथी, न्यारखेडे खुर्द, न्यारखेडे बुद्रुक, सोमठाण जोश या गावात आषाढी एकादशी पर्यंत जल संकीतर्न परिषदा सुरू राहणार आहेत.
पोलीस प्रशासन सतर्क
मुंबईत आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने निवेदनाची प्रत पोलीस संचालकांना पाठवली आहे. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत व प्रमुख ३० कार्यकर्त्यांसोबत येवला तालुका पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली व फौजदारी दंड संहिता १९७३ च्या कलम १४९ अन्वय्ये प्रतिबंध कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक विशाल क्षीरसागर यांनी ही नोटीस बजावली आहे.