सिडको : पुढारी वृत्तसेवा
अंबड-सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भर पावसात मुंबईकडे निघालेला पायी मोर्चा ग्रामीण पोलिसांनी घाटनदेवी येथे थांबवुन त्यांच्या मागण्यांसाठी मनपा आयुक्त कार्यालयात बुधवार (दि.2८) दुपारी १२ वाजता बैठक आयोजित करण्यात आल्याचे पत्र दिले. बैठकीत मागण्या मान्य झाल्या नाही तर मोर्चा मुंबईकडे कूच करणारच असल्याची इशारा अंबड सातपूर प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिला.
अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये एसटीपी प्लांटला तातडीने मंजूरी देत उभा करावा, १९७३ ला औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन करतेवेळी उरलेल्या शेतकऱ्यांच्या जागेत वहीवाटीसाठी सोडलेल्या ४ ते ५ मीटर रस्त्यांचे क्षेत्र वाढवून १२ मीटर व १५ मीटरचे रस्ते मंजूर करण्यात यावे, पीएपी भूखंडापासून वंचित असलेल्या प्रकल्पग्रस्तांना जाचक अटी काढून भूखंड देण्यात यावे, या तीन प्रमुख मागण्या आहेत. याशिवाय महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकामबाबतीतील नोटीसा मागे घेण्यात याव्यात, अंबड व सातपूरच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव घरपट्टी कमी करावी, याही मागण्या आहेत. सोमवारी दि. 26 सकाळी अंबड गावातून भर पावसात मुंबई मंत्रालयाकडे साहेबराव दातीर यांच्यासमवेत बंडोपंत दातीर, शांताराम फडोळ, राकेश दोंदे, रामदास दातीर, शरद फडोळ, मनोज दातीर, महेश दातीर, गोकुळ दातीर, त्र्यंबक मोरे, अविनाश फडोळ, शरद कर्डिले, पांडुरंग दोंदेंसह शेकडो शेतकरी निघाले. ग्रामीण पोलिसांनी हा मोर्चा घाटनदेवी येथे अडवला. यावेळी ग्रामीणचे पोलिस उपअधिक्षक सुनिल भामरे यांनी साहेबराव दातीर यांना मागण्यांवर चर्चेसाठी बुधवारी मनपा आयुक्त कार्यालयात दुपारी बाराला बैठक आयोजित केल्याचे मनपा आयुक्त भाग्यश्री बानायत यांच्या सहीचे पत्र दिले.