नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक असलेला नाशिक जिल्ह्यातील हरिहर किल्ला (Nashik Harihar fort) ट्रेकिंगसाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. सुमारे तीन हजार ६७६ फूट उंच असलेला हा किल्ला अवघ्या सात वर्षे वयाच्या अथर्व मनोहर जगताप या चिमुकल्याने सर केला. विशेष म्हणजे अवघ्या ५६ मिनिटे १० सेकंदांत त्याने हा किल्ला सर केला.
या किल्ल्यावर जाताना बर्याच ठिकाणी ९० अंशांपर्यंत चढाई करावी लागत असल्याने प्रत्येक जण येथे चढाई करू शकत नाही. एका विशाल डोंगर माथ्यावर ८० चित्तथरारक कातळ पायऱ्या आणि चौफर बेलाग कातळकडा अशी या किल्ल्याची रचना आहे. मात्र हा किल्ला चढाईचे साहस अथर्वने दाखविले आहे. त्याच्या या कामगिरीचे कौतुक क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक आणि गिर्यारोहण क्षेत्रातील मान्यवरांनी केले आहे. अर्थवने रामशेज, साल्हेर किल्ला, कळसुबाई शिखर, अंकाई टंकाई आणि धोडप किल्ल्यावर यशस्वी चढाई केली आहे. जास्तीत जास्त मुलांनी साहसी खेळ खेळावे तसेच पालकांनी मुलांना बालशौर्य प्रस्थापित करण्यासाठी प्रेरणा द्यावे असे आवाहन क्रीडा प्रशिक्षक मनोहर जगताप यांनी केले आहे. (Nashik Harihar fort)
हरिहर गडावर चढायला कातळपायऱ्या आहेत. त्यामुळे हा गड चढणे अतिशय अवघड आहे. तब्बल 3676 फूट इतका उंच हा गड आहे. गडाच्या चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. काठावर हनुमानचे मंदिर व बाजूला चौथऱ्यावर महादेवची पिंड व नंदी आहेत. आजूबाजूला ४ ते ५ पाण्याने भरलेल्या कातळटाक्या दिसतात. डावीकडे खाली उतरून तटापर्यंत जाता येते. या किल्ल्याला चौफर बेलाग कातळकडा आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात. दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे. येथील कातळ पायऱ्या चित्तथरारक आहेत. अनेक गिर्यारोहक प्रेमी नाशिकमधील हा किल्ला सर करण्यासाठी येत असतात.
हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुनःस्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्लासुद्धा जिंकला.
हेही वाचा :