नांदेड : राजकारणाचा मार्ग नाही, पण ओबीसीतूनच आरक्षण घेणार : मनाेज जरांगे

file photo
file photo

नांदेड, पुढारी वृत्तसेवा राजकारण माझा मार्ग नाही मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी नांदेड येथे दिला. यावेळी जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली.

मराठा आरक्षणाची पुढील रणणिती ठरविण्यासाठी मनोज जरांगे यांनी सोमवारी (दि.4) नांदेड दौ-यावर आले होते. नांदेडमधील चांदोजी मंगल कार्यालय, येथे रात्री 11 वाजता संवाद बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे रात्री साडेदहा वाजता सभा घेतली.

पुढे बोलताना जरांगे म्हणाले, जनतेने फडणवीसांना गृहमंत्रीपदाच्या गादीवर बसवले. मात्र ते जाणूनबुजून दहशत निर्माण करत असतील तर आम्ही आता सहन करणार नाही. आम्हाला सुद्धा काही मर्यादा आहेत. पूर्वी राजा न्याय द्यायचा. आताच्या राजांना दया माया नाही. जनता बिथरली तरी तीन राजे न्याय देऊ शकत नाहीत. एक राजा न्याय देत असेल तर दोन राजांनी त्याला साथ द्यावी, असेही जरांगे म्हणाले. सगे सोयर्‍यांची अधिसूचना काढण्यात आली आहे. जाणूनबुजून एखाद्या मंत्र्याच्या दबावामुळे तुम्ही हा कायदा करत नाही. मात्र सगे सोयर्‍यांची अंमलबजावणी करण्याशिवाय सरकारकडे दुसरा पर्याय नाही.

10 टक्के आरक्षणाचा सरकारने डाव टाकला. तुमचा प्रत्येक डाव उधळून लावतो. आता घाबरायचे नाही. तुमच्यासोबत भ्रष्टाचारी फिरायलेत त्यांच्यासाठी एसआयटी नेमा, मी तर, गोरगरीबांसाठी फिरत आहे. सरकाच्या दडपशाहीला थोपविण्यासाठी चार कोटी मराठयांना पुन्हा एकदा एकत्र यावे लागेल. तुम्ही मर्यादा ओलांडली तर, मराठे बरोबर कार्यक्रम करतात, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला. तसेच पुढील पाच ते सहा दिवस शांत पाहत बसा. त्यानंतर पुढा-यांनी आमच्या दारात यायचे नाही, अशा आशयाचे पॉम्‍पलेट आपल्या दारावर लावा, असे आवाहनही मनोज जरांगे यांनी केले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news