![नाना पटोले](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F07%2F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : देशाची एकता व अखंडता अबाधित रहावी, यासाठी काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. या यात्रेला जनतेचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष बिथरला आहे. राहुल गांधी यांच्या टी शर्टच्या किंमतीसारखे टुकार मुद्दे भाजपला काढावे लागत आहेत. यातूनच 'भारत जोडो यात्रे'मुळे भाजपला धडकी भरली आहे, हे सिद्ध होत आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
नाना पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेस संपली, राहुल गांधी यांना भाजप महत्व देत नाही, असे म्हणणारे भाजपचे डझनभर नेते, प्रवक्ते, मंत्री राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यासाठी व त्यांची बदनामी करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरु करताच भाजपच्या नेत्यांची कोल्हेकुई सुरु झाली आहे. कारण या यात्रेला जनतेचाच प्रतिसाद मिळत आहे. जनतेचे प्रश्न घेऊन त्यांच्याशी संवाद साधत ते देश पिंजून काढत आहेत. १५० दिवस ३५०० किमीचा प्रवास व १२ राज्यातून ही यात्रा जाणार आहे. सुरुवातीलाच भाजपाला भारत जोड़ो यात्रेची इतकी भिती वाटू लागली आहे. यात्रा जसजशी पुढे जाईल तसा मिळणारा प्रतिसाद भाजपचे डोळे दिपवणारा असेल. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर राहुल गांधी थेट केंद्र सरकारला जाब विचारत आहेत. जनतेचे हे प्रश्नच महत्वाचे आहेत, हे लोकांच्या प्रतिसादावरून दिसून येतेय.
राहुल गांधी यांच्या टी शर्टची किंमत दाखवणाऱ्या पक्षाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी तर १० लाखांचा सूट, १.५ लाखांचा चष्मा, ८० हजाराची शाल, १२ लाखांची कार, ८ हजार कोटी रुपयांचे विमान वापरातात. आणि वरून मी फकीर आहे, असा कांगवा करतात. असा फकीर आपल्या देशाला लाभला आहे, याचे भान भाजपने तरी ठेवायला हवे. राहुल गांधी यांच्या टी शर्टची चिंता करण्यापेक्षा देशाच्या १३० कोटी जनतेला उघड्यावर आणणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारची घटका भरत आली आहे. त्याची चिंता भाजपने करावी, अशी टीका पटोले यांनी केली.
हेही वाचलंत का ?