![सरसंघचालक डॉ मोहन भागवत आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ( संग्रहित छायाचित्र )](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F02%2Fshivraj-sing-meet-mohan-bhagwat.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर : पुढारी वृत्तसेवा – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज बुधवारी नागपुरात संघ मुख्यालयास भेट दिली. तासाभराची धावती भेट, सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यानंतर ते जबलपूरला रवाना झाले.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान नागपुरात पावणे अकराच्या सुमारास आले. ते संघ मुख्यालयात गेले. सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्याशी त्यांनी सुमारे पाऊण तास बंदद्वार चर्चा केली. या चर्चेनंतर बाहेर पडल्यानंतर शिवराजसिंह यांनी माध्यमाशी बोलण्यास नकार दिल्याने या दोघांमधील चर्चेचा तपशील कळू शकला नाही.
मध्य प्रदेशातील राज्य सरकारच्या दारू संदर्भातील धोरणाविरोधात ज्येष्ठ नेत्या, माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी नाराजी व्यक्त करीत आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. शिवराजसिंह यांची यात अडचण होत आहे. माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचे शिवराज यांच्याशी असलेले विळा भोपळ्याचे नाते लक्षात घेता सरसंघचालकांनी यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. उमा भारती यांचे असेच आक्रमक धोरण राहिल्यास सरकारला बॅकफूटवर यावे लागेल, अशी चर्चा आहे. दुसरीकडे कापूस, सोयाबीन, गहू उत्पादकांना कष्टाचा मोबदला भावात मिळत नसल्याची नाराजी देखील शिवराजसिंह यांच्या अडचणी वाढविणार असल्याची चर्चा मध्य प्रदेशमध्ये रंगली आहे.
हेही वाचा :