पुणे; पुढारी वृत्तसेवा : गर्भावस्थेत महिलेचे वजन 8 ते 12 किलोने वाढणे हे नैसर्गिक आहे. परंतु, आजकालच्या नवीन माता वाढत्या वजनाबाबत खूप काळजी करतात. वजन लवकर कमी करण्याच्या घाईचा परिणाम त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे दोघांच्या आरोग्याचा विचार करून मातांनी स्तनपान, आहार याकडे लक्ष द्यायला हवे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती अभियान राबवले जात आहे.
त्यासाठी नवमातांना स्तनपानाचे महत्त्व आणि त्यासाठी आवश्यक असणारा आहार याबाबत डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जात आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. शैलजा माने म्हणाल्या, 'आईने योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवे. आईच्या दुधामध्ये जास्त प्रमाणात पाणी असते. तेवढे अधिक पाणी पिणे व पौष्टिक आहार घेणे आवश्यक असते. 'घराबाहेरील जंक फूड, शीतपेये टाळायला हवीत. आई जे खाते, त्यानुसार स्रावाची निर्मिती होते. त्यानुसार प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वांचे प्रमाण असते. त्यामुळे आईने पौष्टिक, घरगुती, सकस अन्नाचे सेवन करणे फायद्याचे ठरते.'
नवमातांनी दोनदा जेवण आणि दोनदा नाश्ता केला पाहिजे. मधल्या वेळेत फळे, सुका मेवा खायला हवा. हळीव, मेथी किंवा बाजरीसारखे पारंपरिक पदार्थ खाल्ल्याने दूध वाढायला मदत होते. व्यवस्थित आहार न घेतल्यास हाडे ठिसूळ होऊन कंबर दुखणे, पाठदुखी किंवा गुडघे दुखणे यांसारख्या व्याधी सुरू होतात. त्यामुळे पोषक आणि समतोल आहार घेणे गरजेचे आहे.
– डॉ. शैलजा माने, बालरोग विभागप्रमुख, डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
हेही वाचा