पुढारी ऑनलाईन डेस्क : दरवर्षापेक्षा यंदा मान्सून ७ दिवस उशिरा भारतात पोहचला आहे. केरळात १ जानेवारीला दाखल होणारा मान्सून यंदा मात्र चक्रीवादळाच्या अडथळ्याने ८ जूनला केरळमध्ये दाखल झाला. यानंतर १८ जून ते २१ जूनपर्यंत नैऋत्य मान्सून संपूर्ण दक्षिण आणि पूर्व भारतात पोहचणार आहे. मान्सून (Monsoon Updates) पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे, अशी माहिती IMD पुणेचे विभागप्रमुख के.एस.होशाळीकर यांनी ट्विटरवरून दिली आहे.
भारतातील केरळमध्ये ८ जूनला मान्सून दाखल झाला. यानंतर हळूहळू मान्सूनने केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यांमधील बहुतांश भाग व्यापला आहे. महाराष्ट्रात देखील ११ जूनला मान्सून दाखल झाला. दरम्यान मान्सूनच्या (Monsoon Updates) पुढील वाटचालीसाठी सध्या अनुकूल स्थिती निर्माण होत आहे. १८ जून ते २१ जूनपर्यंत तो संपूर्ण दक्षिण आणि पूर्व भारतात तसेच त्याच्या आसपासच्या भागापर्यंत पोहचणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आले आहे.
पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे हिमालयापलीकडे न गेल्याने मान्सून अत्यंत क्षीण झाला आहे. सध्या तो तळकोकणात असला, तरीही बिपरजॉय चक्रीवादळाने त्यातील आर्द्रता शोषून घेतली. त्यामुळेही पुढे जाण्याइतका जोर सध्या नाही. त्यामुळे तो 25 जूननंतरच जोर धरेल, असा अंदाज ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञांनी दै. 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केला.
मान्सून दरवर्षी 7 ते 8 जूनपर्यंत तळकोकणात व पुढे 10 ते 11 जून मुंबई आणि 15 जूनपर्यंत महाराष्ट्र गाठतो. मात्र, यंदा अरबी समुद्रात आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनच्या वार्यामधील आर्द्रता शोषून घेतल्याने मान्सूनचा प्रवास थबकला आहे.