अमरावती, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नादाला लागाल तर तलवारीने हात छाटू ,असे खळबळजनक वक्तव्य वरुडचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना भुयार बोलत होते.
मुंबईच्या ठाकरेंची दहशत कालही होती. आजही आहे आणि उद्याही राहील. तुमची दहशत नदीच्या काठापर्यंत असल्याचे विरोधकांना सांगत आमच्या नादाला लागायचं नाही, असा खणखणीत इशारा त्यांनी स्थानिक विरोधकांना दिला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या नादाला तर लागायचे नाही असेही ते म्हणाले. शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत जाणीवपूर्वक धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला.
यापुढे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला हात लावण्याचा काम केलं तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. शिवाय जुना देवेंद्र भुयार अंगात आणायला लावू नका, असा दम यावेळी आमदार भुयार यांनी दिला.