नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, अद्यापही काही विद्यार्थी अर्ज करण्याचे, तर काही विद्यार्थ्यांचे अर्ज प्रमाणित होणे बाकी आहे. इयत्ता दहावी राज्य मंडळाकडून गुणपत्रिका 14 जूनला वितरित होणार आहेत. मूळ गुणपत्रिका मिळाल्याशिवाय विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या शाळा सोडल्याचा दाखला मिळणार नाही. त्यामुळे इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेता येणार नाही. त्या पार्श्वभूमीवर नियमित प्रवेश फेरी एकसाठी अर्ज करण्यास व सर्व कार्यवाहीसाठी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात येत असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यानुसार अर्जाचा भाग एक १४ जूनपर्यंत, तर भाग दोन १७ जूनपर्यंत भरता येणार आहे. २१ जूनला पहिल्या नियमित फेरीसाठी अलॉटमेंट जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, ६४ महाविद्यालयांतील २६ हजार ७२० जागांसाठी २१ हजार ३३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. १७ हजार ९९६ विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक झाले असून, १२ हजार ८०० हजार अर्जांची पडताळणी झाली आहे. त्यापैकी १२ हजार ६४१ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन भरला आहे.