मिरज, पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सोशल मीडियावरुन मराठा समाजाविरोधात प्रक्षोभक भाषण करून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य समन्वयक विलास देसाई यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
विलास देसाई यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, देशभरात विखुरलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सन 2016 पासून समाजाचा लढा सुरू आहे. यासाठी राज्यभरात मुक मोर्चे काढण्यात आले होते. याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने दिलेले आरक्षण उच्च न्यायालयाने कायम केले होते.
परंतु, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात निकालानंतर अपील करून अॅड. सदावर्ते यांनी मराठा आणि मागासवर्गीय समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतुने सन 2021 मध्ये प्रक्षोभक भाषण केले होते. दोन दिवसांपूर्वी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे.
दरम्यान, मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अॅड. सदावर्ते यांच्या भाषणामुळे जातीय तेढ निर्माण होवून अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल मीडियावरुन मराठा समाजाच्या भावना दुखावतील, असे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे या अर्जात नमूद केले आहे.
हेही वाचा