तुमचा स्‍वभाव ठरवताे आजार!, जाणून घ्‍या कारण आणि उपाय

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे एकमेकांशी निगडीत असते. आपल्या शारीरिक समस्येचा परिणाम आपल्या मनावर होतो त्यामुळे मानसिक समस्येचा परिणाम शरीरावर होतो. काही नकारात्मक भावना आणि स्वभाव यांचा शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे अनेक आजार होतात. त्यापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टी अमंलात आणल्या पाहिजेत. ( Mind and Body Connection)

संबंधित बातम्या 

मन आणि शारीरिक आरोग्य यांचे नाते गहिरे असते. अनेक अभ्यासातून ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते आपला सातत्याने शरीराशी संवाद साधत असतो. तणावात असलो तर घाम येतो, जीभ सुकते, बोलणे अडखळते आणि हृदयाची धडधड वाढते. अशाच प्रकारे आनंद, अपेक्षा आणि आशा यांच्याशी निगडीत भावना, कार्डिओव्हॅस्क्युलर, पल्मोनरी डिसीज, हृदयरोग, मधुमेह आणि नैराश्य यासारख्या मानसिक आजारांची जोखीम कमी करण्यास मदत करतात. व्यक्तीचा स्वभाव आणि भावना आपल्या शारीरिक आरोग्यावर प्रभाव टाकत असतात.

उतावीळपणा : अल्सर आणि इरिटेबल बावेल सिंड्रोमची जोखीम

स्वभावात उतावीळपणा असेल तर अत्यंत महत्त्वाचे निर्णयही व्यक्ती फारसा विचार न करता घेतातच शिवाय त्याचा परिणामही लगेच कळावा अशी आशा करतो. अशातच अनेकदा आपण हताश होतो. उतावळ्या स्वभावाच्या लोकांमध्ये स्ट्रेस हार्मोन्स कार्टिसोल सतत स्रवत असते. त्यामुळे त्यांच्या पोटात आम्लाचा प्रभाव वाढतो. त्यामुळे अल्सर आणि इरिटेबल बावेल सिंड्रोमची जोखीम वाढते.

Mind and Body Connection : उपाय काय?

प्रत्येक काम सहजपणे चांगल्या प्रकारे करण्याची सवय लावून घ्यावी. एखाद्या कामाविषयी किंवा परिस्थितीविषयी नकारात्मक विचार येतील तेव्हा त्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी दुसर्‍या कुठल्यातरी सोप्या किंवा गंमतीशीर अ‍ॅक्टिव्हिटीत मन गुंतवावे.

लाजरेपणा : सर्दी, खोकला होण्याची शक्यता अधिक

नव्या लोकांमध्ये किंवा खूप अधिक लोकांमध्ये गेल्यावर अस्वस्थ होत असेल आणि त्यांच्याशी संवाद साधण्यास संकोचत असेल किंवा लाज वाटत असेल, तर मनाच्या स्वाभाविक भावनांचे दमन होते. लाजाळू किंवा संकोची लोकांमध्ये विषाणूजन्य संसर्ग तसे सर्दी, खोकला होण्याची शक्यता अधिक असते. लाजाळूपणाचा प्रतिकार क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो. त्याचबरोबर सिम्पॅथिक नर्व्हस सिस्टिमसुद्धा अतिसक्रिय होते. त्यामुळेच अनपेक्षित परिस्थितीत व्यक्ती एकदम घाबरून जाण्यास भाग पडते.

Mind and Body Connection :  उपाय काय?

लाजाळूपणा दूर करण्यासाठी लहान लहान पावले टाकावी लागतील. लोकांशी बोलणे टाळत असाल, तर आय कॉन्टॅक्ट करून हसावे. समूहातील ज्या व्यक्ती ओळखीच्या असतील, त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात करावी. या परिस्थितीचा सामना करण्यापूर्वी एकांतात त्याची प्रॅक्टिसही करता येईल. आपल्या ओळखीच्या लोकांबरोबर काही समूह क्रियांमध्ये सहभागी होऊ शकता.

भांडकुदळपणा : हृदयरोगाची शक्यता

काही व्यक्ती कायमच कुणाशीही भांडायला तयारच असतात. कारण, त्यांना आपले मत किंवा द़ृष्टीने योग्य आणि चांगली वाटते. मग, लोक या व्यक्तींपासून लांबच राहतात. तसेच या व्यक्तीही सतत तणावात राहतात. ज्या विवाहित जोडप्यामध्ये सातत्याने भांडणे होतात त्यांना आरोग्याच्या काही समस्या भेडसावतात. बोलता बोलता भांडणे करणार्‍या महिलांच्या धमन्या कठोर होतात आणि पुरुषांना एथेरोस्केलोरोसिस नावाची समस्या निर्माण होते. दोन्ही परिस्थितीत हृदयरोग जडण्याची शक्यता असते.

उपाय काय?

जेव्हा आपण एखाद्या मुद्द्यावर वादविवाद करण्यास प्रवृत्त होतो तेव्हा तो कसा टाळता येईल ते पाहावे. शक्यतो 20 मिनिटे तरी तो टाळावा. या दरम्यान आपले काही महत्त्वाचे काम करावे. टीव्ही पाहावा किंवा पुस्तक वाचावे. वादाच्या मुद्द्याविषयी काहीही न बोलण्याचा निर्णय घेणे हे सर्वात महत्त्वाची गोष्टी करू शकता. त्यामुळे वाद किंवा भांडणे संपून जातील.

चिडचिडेपणा : अनेक अवयवांवर विपरीत परिणाम

काही लोक प्रत्येकामध्ये काही ना काही चूक शोधण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच दुसर्‍याला चिडवण्याची सवय असते. अशा वेळी प्रत्येक गोष्टीत चिडचिडेपणा आणि तणाव जाणवतो. लहान लहान गोष्टीही मोठ्या वाटू लागतात. तसेच अगदी छोट्या गोष्टीही मोठ्या करतात. सततचा तणाव आणि चिडचिडेपणा शरीरातील पेशी आणि मेंदू या दोन्हीवर वाईट परिणाम करतात. अशा प्रकारे सायकॉलॉजिकल डिसऑर्डर होण्याबरोबरच हार्ट अ‍ॅटॅक येण्याचा धोकाही वाढतो. तणावामुळे शरीरात बायोकेमिकल असंतुलन उत्पन्न होते. ज्यामुळे शरीराच्या अनेक अवयवांवर किंवा क्रियांवर विपरीत परिणाम होतो.

उपाय काय ?

चिडचिडेपणा आणि सतत दुसर्‍यांना कमी लेखण्याच्या सवयीपासून सुटका करण्यासाठी ध्यानधारणेची मदत घ्यावी. आपले विचार सकारात्मक करून दुसर्‍यांच्या चुका शोधण्याची सवय बदलावी. चांगली वाक्ये आणि सकारात्मकता देणारी, प्रोत्साहन देणारी पुस्तके वाचावीत.

चापलुसी : नैराश्य आणि एन्झायटीला आमंत्रण

समोरच्या व्यक्तीला सातत्याने खूश करणे आणि त्यांनी आपली वाहवा करावी यासाठी प्रयत्नशील राहणे अशी आपली वर्तणूक असेल, तर चापलुसी व्यक्ती या प्रकारात आपण मोडता. त्यामुळे व्यक्तीची स्वतःची ओळख हरवू लागते आणि आपल्याविषयी दुसरे काय विचार करतात, हे जाणून घेण्यातच त्यांना रस असतो. या स्वभावामुळे अनेकदा आत्महीनता आणि असंतोषाची भावना जागृत होते. सतत दुसर्‍यांनी आपले कौतुक करावे, मान्यता द्यावी असे वाटते. प्रत्येक वेळी हे शक्य नसते. या सर्वांमुळे आपल्याला नैराश्य आणि एन्झायटीला सामोरे जावे लागते.

उपाय काय ?

सतत हो हो करण्याची सवय सोडून द्या. आपली सर्व ऊर्जा दुसर्‍यांना खूश ठेवण्यासाठी नव्हे, तर स्वतःचे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी खर्च करावी. दुसर्‍यांना खूश करण्यापूर्वी स्वतः आनंदी राहणे गरजेचे आहे. तसेच सातत्याने खोटेपणाने समोरच्याला खूश करण्याच्या स्वभावामुळे आपल्यात नकळतपणाने न्यूनगंडही येत जातो.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news