![Mid Day Meal](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F09%2FMid-Day-Meal.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाइन डेस्क : Mid Day Meal : बिहारमध्ये एका प्राथमिक शाळेत मंगळवारी दुपारचे जेवण (मध्यान्ह भोजन) केल्यानंतर 50 हून अधिक मुलांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यापैकी 5 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली आहे. डॉक्टरांनी मुलांनी शाळेत केलेल्या जेवणात सरडा आढळल्याचे म्हटले आहे.
ही घटना बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील डुमरा प्रखंडच्या भासर मछरा येथील दक्षिणी पंचायत अंतर्गत येणाऱ्या रिखौली गावातील प्राथमिक शाळेतील आहे. सरकारी शाळांमध्ये मुलांना माध्यान्ह भोज (Mid Day Meal) दिले जाते. मंगळवारी नेहमीप्रमाणे मुलांनी मध्यान्ह भोजन घेतले. जेवणामध्ये भात आणि त्यासोबत सोयाबीनची भाजी होती. मात्र, जेवणानंतर एक एक करून अचानक विद्यार्थ्यांना पोटात त्रास होऊ लागला तर अनेकांना उलटीचा त्रास सुरू झाला. जवळपास 50 विद्यार्थ्यांना सदर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या शाळेची एकूण पटसंख्या 318 आहे. मात्र 179 मुले त्यादिवशी मंगळवारी शाळेत उपस्थित होती. मात्र सुरुवातीला पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना Mid Day Meal (माध्यान्ह भोज-दुपारचे जेवण) दिले जाते. त्यानंतर पुढच्या इयत्तेतील मुले जेवतात. त्यामुळे आजारी मुलांची संख्या 50 इतकीच आहे. अन्यथा 150 हून अधिक विद्यार्थी आजारी पडले असते, अशी माहिती आज तकने दिली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमडीएम (मिड डे मिल- MDM – माध्यान्ह भोज) डीपीओ आयुष कुमार शाळेत पोहोचले आणि मुख्य प्रभारी आणि स्वयंपाकी यांच्याकडून प्रकरणाची माहिती घेतली. हजेरी रजिस्टरही तपासण्यात आले. या प्रकरणी एमडीएम डीपीओ आयुष कुमार म्हणाले की, त्यांना दुपारी १.३० वाजता एमडीएममध्ये (मिड डे मिल- MDM – माध्यान्ह भोज) सरडा असल्याची तक्रार मिळाली. त्याची पडताळणी केली जात आहे. बाधित मुलांवर उपचार करण्यात आले आहेत. बहुतांश मुले बरी होऊन घरी परतली आहेत.
या प्रकरणाबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी प्रमोदकुमार साहू म्हणाले की, यापूर्वीही मुख्याध्यापकांना त्रास देण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांकडून अशा अफवा पसरविण्यात आल्या होत्या. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपास पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
तर हिंदुस्थानने दिलेल्या माहितीनुसार, आयुष कुमार यांनी पाल आढळल्याच्या वृत्ताबाबत ही अफवा आहे, असे म्हटले आहे. मुलांना शाळेतील पिंपळाच्या झाडाखाली जेवण दिले जात होते. त्यापैकी कोणाच्या तरी ताटात काहीतरी आढळले आणि गोंधळ सुरू झाला. दरम्यान, उरलेले जेवण फेकून देण्यात आले आहे. तसेच घटनेची संपूर्ण माहिती घेऊन तपास केला जाईल, कोणी दोषी आढल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
मुले आजारी पडल्यानंतर 112 नंबर वर कॉल करून तक्रार देण्यात आली. तसेच पालकांना सूचना देण्यात आल्या. त्यामुळे पालक तातडीने शाळेत पोहोचले. त्यांनी देखील डुमरा पीएचसी येथे मुलांना पोहोचवण्यासाठी मदत केली. दरम्यान घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये आक्रोश निर्माण झाला. तर संतप्त पालकांनी शिक्षक आणि जेवण बनवणाऱ्या आचाऱ्याला डांबून ठेवले. दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस देखील शाळेत पोहोचले. तसेच एमडीएम डीपीओ आयुष कुमार यांनी कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी शिक्षकांना सोडले.
सदर रुग्णालयातील डॉक्टर सुधा झा यांनी याबाबत माहिती दिली, "त्यांनी मध्यान्ह भोजनात एक सरडा आढळल्याची तक्रार केली आहे. विद्यार्थ्यांनी तेच अन्न खाल्ले होते. तसेच सध्या सर्व मुले स्थिर आहेत आणि त्यांच्यात आता कोणतीही लक्षणे आढळत नाही आहे. आम्ही त्यांना निरीक्षणाखाली ठेवले आहे. आता सर्व काही सामान्य आहे. त्यांचे पालक त्यांच्यासोबत आहेत. काळजी करण्यासारखे काही नाही." असे एएनआयने 'X' वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
उपचारानंतर मुलांची स्थिती सामान्य झाल्यानंतर 24 हून अधिक मुलांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. डॉ. आलम आणि डॉ. ओएन मिश्रा यांनी मुले आता कोणत्याही धोक्यापासून बाहेर आहेत. जस-जसे मुलांची प्रकृती सुधारत आहे तसतसे त्यांना सोडण्यात येत आहे. तर काही मुले गंभीर आहेत. त्यांना सदर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तिथे तब्बल 21 मुलांवर उपचार सुरू आहे, असे हिंदुस्थानच्या वृत्तात दिली आहे.
हे ही वाचा :