पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेंच्युरियन येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय सलामीवीरांनी धमाकेदार कामगिरी केली आहे. मयंक अग्रवाल आणि केएल राहुल या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली. भारतीय सलामीवीरांनी दक्षिण आफ्रिकेत केलेली ही तिसरी शतकी भागीदारी आहे. मयंक अग्रवाल 123 चेंडूत 60 धावा करून बाद झाला. त्यामुळे ही भागिदारी संपुष्टात आली. (Mayank-Rahul Partnership)
2010 नंतर दक्षिण आफ्रिकेत भारतीय सलामीवीरांची ही पहिली शतकी भागीदारी आहे. अखेरच्यावेळी गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी 2010 मध्ये सेंच्युरियनमध्येच 137 धावांची सलामी दिली होती. मात्र, भारताच्या दुसऱ्या डावात त्यांनी हा पराक्रम केला होता. पण टीम इंडियाला तो सामना एक डाव आणि २५ धावांनी गमवावा लागला होता. (Mayank-Rahul Partnership)
याशिवाय वासिम जाफर आणि दिनेश कार्तिक यांनी 2007 मध्ये केपटाऊनमध्ये 153 धावांची सलामी दिली होती. या सामन्यात जाफरने शानदार 116 धावा केल्या. टीम इंडियाने तो सामनाही 5 विकेटने गमावला होता.
भागिदारी (धावा): ओपनिंग जोडी : ठिकाण आणि वर्ष
153 : वसीम जाफर आणि दिनेश कार्तिक : केपटाउन 2006/07
137 : गौतम गंभीर आणि वीरेंद्र सहवाग : सेंचुरियन 2010/11
117 : केएल राहुल आणि मयंक अग्रवाल : सेंचुरियन 2021/22
मयंक आणि राहुल यांच्यातील भागीदारी ही 2010 नंतर दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठी सलामीची भागीदारी आहे. गेल्या 11 वर्षात सेहवाग, मुरली विजय, शिखर धवन आणि गौतम गंभीरसह अनेक दिग्गजांना हा विक्रम करता आला नाही. या दोघांपूर्वी, भारताकडून आफ्रिकन देशात गेल्या 11 वर्षांत पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी सेहवाग आणि विजय यांच्यात झाली होती. तीपण 43 धावांची.
एकूणच भारतासाठी आफ्रिकेत कोणत्याही विकेटसाठी सर्वाधिक 222 धावांची भागीदारी झाली आहे. मोहम्मद अझरुद्दीन आणि सचिन तेंडुलकर यांनी 1997 मध्ये केपटाऊन येथे सहाव्या विकेटसाठी ही भागीदारी केली होती. तर, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी 2013 मध्ये जोहान्सबर्ग येथे तिसऱ्या विकेटसाठी 222 धावांची भागीदारी केली होती.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या स्थापनेनंतर पाहुण्या फलंदाजाने यजमान देशात मालिकेतील सलामीच्या सामन्यात ५० हून अधिक धावांची सलामीची भागीदारी करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2007/08 मध्ये ख्रिस गेल आणि डॅरेन गंगा यांनी पोर्ट एलिझाबेथ येथे 98 धावांची भागीदारी केली होती. 2021 मध्ये भारतीय सलामीवीरांनी कसोटीमध्ये आशियाबाहेर 20 पेक्षा जास्त षटके फलंदाजी करण्याची ही सातवी वेळ आहे. 2011 ते 2020 पर्यंत एकदाही असे होऊ शकले नाही.