![Marathwada Cabinet Meeting | ‘वॉटर ग्रीड’ प्रकल्पाचा ठाकरे सरकारकडून खून- उपमुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F09%2F%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3-%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : मविआ सरकारने गेल्या अडीच वर्षात काय केलं? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच मराठवाड्यातील वॉटर ग्रीड प्रकल्पाचाही तत्त्कालीन ठाकरे सरकारने खून केला असल्याचा आरोप देखील ठाकरे सरकारवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. ते कॅबिनेट बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (Marathwada Cabinet Meeting)
दुष्काळसद़ृश परिस्थिती, सिंचन अनुशेषच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, आमच्या सरकारने महत्त्वांच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे. ठाकरेंच्या काळात थांबलेले प्रकल्प आमच्या युतीच्या काळात पुन्हा मार्गी लागले. ३१ प्रकल्पांपैकी २३ प्रकल्प पूर्ण झालेत, तर ७ प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. एकूण १०६ प्रकल्पांना मान्यता दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाकरेंच्या काळात थांबलेले प्रकल्प पुन्हा मार्गी लागलेत. वॉटर ग्रीड प्रकल्पाला केंद्र सरकार मदत करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे. (Marathwada Cabinet Meeting)
महायुती सरकारने आजपर्यंत सामान्यांसाठी निर्णय घेतले आहेत. आम्ही घोषणा करून कागदावर ठेवत नाही तर अंमलबजावणीही करतो. त्यामुळे आम्ही प्रकल्प रोखणारे नाही तर सुरू करणारे आहोत अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ते कॅबिनेट बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.