![संजय राऊत](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F10%2Fsanjay-raut.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या विधेयकावर मराठा समाज अस्वस्थ आहे. मनोज जरांगे पाटील उपोषण करीत आहेत. तर सरकारचे मंत्री मात्र नाचण्यात दंग आहेत. नाचून हा प्रश्न सुटणार नसून उद्या राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरकार मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे वरातीत रस्त्यावर नाचणार आहेत का, असा संतप्त सवाल शिवसेना (ठाकरे) संजय राऊत यांनी उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला.
संबंधित बातम्या
मराठा समाजाला आरक्षण देण्यारे विधेयक विशेष अधिवेशनात मंजूर करण्यात आले. सरकारने मराठ्यांना शिक्षण व नोकरीत 10 टक्के आरक्षण दिले. मात्र, मराठा समाजाला हा निर्णय मान्य नाही. प्रत्येकाच्या मनात अस्वस्थता आहे. सरकारने समाजाची फसवणूक केली, अशी भावना आहे. स्वतंत्र आरक्षण देणार असल्याचे सांगत सरकारने मराठ्यांच्या तोंडाला पाने पुसली. देशात फसवाफसवीचे खेळ सुरू आहेत. मराठा आरक्षणापासून चंडीगड महापौर निवडणुकीपर्यंत हा पक्ष फसवाफसवीच्या पायावर उभा आहे, असे राऊत म्हणाले.
देशातील विविध राज्यात शेतकर्यांची वेगवेगळी उत्पादने आहेत. सर्व शेतकरी नेत्यांनी एकत्र येऊन सरकारकडे मागणी करावी, अशी भूमिका शेतकर्यांनी घेतली आहे. परंतु, सीमापार केल्यास गोळ्या झाडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत असा आरोपही त्यांनी केला.