पुढारी ऑनलाईन डेस्क : जालना येथे मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या आंदोलनाचा पंधरावा दिवस आहे. शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनीही आज (दि.१२) घटनास्थळी भेट देत मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेली मागणी शंभर टक्के योग्य आहे आणि या आंदोलनाला शिवप्रतिष्ठानचा पाठींबा आहे. (Maratha Reservation)
जालना येथे मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळवून देण्याच्या मागणीसाठी केलेले उपोषण आणि या ठिकाणी झालेली दगडफेक, लाठीमाराच्या घटनांमुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. आज (दि.१२) शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी जालना येथील मराठा आंदोलन घटनास्थळी भेट देत मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. या दरम्यान जरांगे यांच्याशी बोलताना ते म्हणाले की, "जस पाहिजे तस मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, या निश्चयाने आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही जे काही करत आहात ते १०१% योग्य आहे. तुमच्या या तपश्चर्येला नक्की फळ येणार.
पुढे बोलत असताना भिडे म्हणाले की,"आता राजकारण्यांच्या हातात हा प्रश्न आहे. आता जे राजकारणात सत्तेवर बसले आहेत म्हणजे एकनाथ शिंदे ते कपटी नाहीत, तर देवेंद्र फडणवीस बेईमानी करणार नाहीत, अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असले तरी, काळजी करणारा माणुस आहे. सरकारमधील हे तिन्ही नेते आपल्या शब्दाशी प्रामाणिक राहतील. ते राजकारणी आहेत म्हणून भीती बाळगू नका. आणि ते शब्द देतील तो त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यायचं काम माझ्याकडे असेल. ही लढाई आहे आणि ही लढाई तुम्ही नक्की जिंकणार आहात. तुम्ही हे उपोषण करत आहात ते कौतुकास्पद आहे. हे उपोषण मागे घ्यावे. मी तुम्हाला नाउमेद करायला आलेलो नाही. आणि जो पर्यंत मराठा आंदोलनाचा जो उद्देश आहे तो सफल होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत.
हेही वाचा