Maratha Reservation : सरसकट कुणबी आरक्षण कोर्टात टिकणार नाही : ना. गिरीश महाजन

गिरीश महाजन
गिरीश महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीनुसार मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्याचा जीआर काढला तर तो कोर्टात टिकणार नाही, असा दावा भाजप नेते तथा राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातूनच मार्ग निघेल. या मुद्द्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जरांगे-पाटील यांनी शासनाला वेळ द्यायला हवा, असेही महाजन यांनी म्हटले आहे. Maratha Reservation

महाजन यांनी सोमवारी (दि.११) नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणाच्या ज्वलंत मुद्द्यावर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या विषयावर तोडगा निघावा, यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र, जरांगे-पाटील यांनीही आता उपोषण सोडावे. त्यांची मागणी सुरुवातीला वेगळी होती. मराठवाड्यामधील मराठा समाज वेगळा आहे, असे त्यांनी सांगितले होते. कुणबी समाज वेगवेगळ्या भागांत आहे. मराठवाड्यातील निजाम काळातून वेगळे झाल्यानंतर समाज कुणबी मराठा झाला. आता ते मागणी करतायत, संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखला द्यावा. हे कायद्याच्या चौकटीत बसणारे नाही. हे अशक्य आहे, कोर्टातूनच आरक्षण घ्यावे लागेल. न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याबद्दल महाजन म्हणाले की, आरक्षणासाठी सगळे समाज रस्त्यावर उतरले तर राज्याच्या हिताचे होणार नाही. आरक्षण सर्वांनाच पाहिजे आहे, कुणाला नको आहे. कॅबिनेटमध्ये निर्णय करून हा प्रश्न सुटणार नाही. त्याला कायद्याचा आधार असला पाहिजे.

उध्दव ठाकरेंची कीव येते…

जळगावच्या सभेत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेचाही महाजन यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, देवेंद्रजींबद्दल उद्धव ठाकरे बोलत होते, तेव्हा त्यांची मला कीव येत होती. फस्ट्रेशन आल्याने ते असे बोलत आहेत. त्यांच्या मागे कोणी राहिले नाही म्हणून ते अस्वस्थ आहेत. आम्हाला त्यांचे शारीरिक व्यंग काढायचे नाही. पंतप्रधान यांच्यावर त्यांनी काय बोलावे? विरोधी पक्षात आहे म्हणून त्यांना बोलावे लागते. पण, त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवेल का? विश्वासार्हता असायला पाहिजे ? मुख्यमंत्री असताना तुम्ही काय दिवे लावले? अशी टीकाही महाजन यांनी ठाकरेंवर केली.

दंगली घडविणाऱ्यांची चौकशी व्हावी!

सातारा येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर महाजन म्हणाले की, राज्यात कुणाला अस्थिरता माजवायची आहे? कुणाला दंगली घडवायच्या आहेत? याची चौकशी झाली पाहिजे. जाणीवपूर्वक अस्थिरता कोण निर्माण करतय? कोण खतपाणी घालत आहे, याचीही चौकशी पोलिस करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. संजय राऊत हे लोकांना उचकवायला लागले आहेत. त्यांची चौकशी झाली पाहिजे. उद्धव ठाकरे अतिशय बालिश स्टेटमेंट करत आहेत. त्यांनाच काही घडवून तर आणायचं नाही ना?. याची चौकशी झाली पाहिजे पोलिसांनी यांनाच ताब्यात घेतले पाहिजे, असे महाजन म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news