![मला सर्वाधिक फोन देवेंद्र फडणवीसांचेच यायचे; नि:पक्षपातीपणे SIT चौकशी करा : जरांगे](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F02%2FUntitled-design-6-4.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी विधीमंडळात केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जरांगेंचा बोलविता धनी कोण? हे आता बाहेर येत असल्याचे सांगितले. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "एसआयटी चौकशी करायची असेल तर नि:पक्षपातीपणे करा. मला सर्वाधिक फोन देवेंद्र फडणवीस यांचेच यायचे," असा दावा जरांगेंनी केला आहे.
"मी मराठा समाजसाठी काय केले यासाठी कोणाचाही दाखल्याची गरज नाही. मी काय केले आहे ते सर्वांना माहित आहे. मी नेहमीच वाईटाला वाईटच म्हटलं आहे. कधीच चुकीचे समर्थन केलेले नाही, असे स्पष्ट करत आज आपलं राजकारण जातीच्या नावाखाली कोणत्या थराला गेले आहे? आपण समाजाला विघटीत करण्याचे राजकारण करणार असलो तर आपण कोठे चाललो आहोत? मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लावण्यासाठी कोणी पैसे दिले?, अशी सवालांची सरबत्ती करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२७) विधानसभेत मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. मनोज जरांगे-पाटील यांनी माझ्यावर आरोप केल्यानंतर आज मराठे माझ्या मागे उभे राहिले आहेत. मराठा आंदोलनावेळी लाठीमार का झाला, यावेळी हिंसाचार कोणी घडवून आणला यामागील षड्यंत्र बाहेर येतेय. आंदोलनाला हिंसक वळण लावण्यासाठी कोणी पैसे दिले, याचा शोध घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
एसआयटी चौकशी करायची असेल तर नि:पक्षपातीपणे करा. मला सर्वाधिक कॉल देवेंद्र फडणवीस यांचेच आले आहेत. त्याच्यात ते काय बोलले ते पण मी ओपन करतो, असे प्रत्युत्तर जरांगे पाटील यांनी दिले आहे.
कुणाच्या मनात संभ्रम नको. मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना दिली. मराठा आरक्षणाला दिलेले आरक्षण कसे टिकणार नाही हे दाखवून द्या, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले. सरकार म्हणून आम्ही निर्णय घेणारे लोक आहोत. पण एकेरी उल्लेख, खालच्या पातळीची भाषा योग्य नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. जरांगे-पाटील यांच्या तोडून जी भाषा येतेय ती कुणाची आहे? ही व्युहरचना कुणाची? असा सवालही त्यांनी केला.
हेही वाचा :