![Biryani : बिर्याणी खाल्याने पौरुषत्व कमी होते, ‘तृणमूल’च्या नेत्याने दोन दुकानं केली बंद](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F10%2Fbiryani.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्हाला बिर्याणी (Biryani) खायला आवडते का? जर तुम्हाला आवडत असेल आणि तुम्ही पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये रहात असाल तर तुम्हाला काही दुकानात बिर्याणी खायला मिळणार नाही. खरं तर, ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसच्या (टीएमसी) नेत्याने एक अजब तर्क लावला आहे. बिर्याणी खाल्ल्याने पुरुषांच्या पौरुषत्वावर परिणाम होत असल्याचा आरोप करत टीएमसीच्या या नेत्याने दोन बिर्याणीची दुकाने बंद केली आहेत. कूचबिहार नगरपालिकेचे अध्यक्ष आणि तृणमूल नेते रवींद्रनाथ घोष यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून स्थानिक लोकांनी काही तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर जेव्हा टीएमसी नेते रवींद्रनाथ घोष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धडक मोहीम राबविली. त्यांनी बिर्याणीच्या दुकानांमध्ये (Biryani Shops) जाऊन तपास केला. त्यावेळी दुकान चालकांकडे परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी ही दुकाने तत्काळ बंद केली.
रवींद्रनाथ घोष म्हणाले की, 'बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोक काही दिवसांपासून येथे येऊन बिर्याणी (Biryani Shops) विकत आहेत. या दुकानांमध्ये बिर्याणी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे पुरुषांच्या पौरुषत्वावर परीणाम होत आहे. याबाबत काही काळापासून तक्रार होत होती. त्यानंतर आम्ही येथे छापा टाकला. त्यावेळी या दुकान चालकांकडे परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे ही दुकाने बंद करण्यात आली आहेत.'