पुढारी ऑनलाईन: उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराची सत्ता उलथून देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत आले. हे सत्य अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पचत नाही. म्हणून अहंकाराच्या नशेतून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात. उद्धव ठाकरे हे 'किंचित सेनेचे पक्षप्रमुख' आणि वैफल्यग्रस्त असल्याचे म्हणत भाजप प्रदेशाअध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Maharashtra Politics) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
दरम्यान 'सामना' दैनिकातील 'फडणवीस सांभाळा' या अग्रलेखातून फडणवीसांवर टीका करण्यात आली आहे. या वरून बावनकुळे यांनी ट्विटवरून म्हटले आहे की, किंचित सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बोरूबहाद्दर संजय राऊत यांनी आज सामनातून गरळ ओकळी आहे. अहंकाराच्या नशेत झिंगून ते देवेंद्रजींवर टीका करत आहेत. 'सुंभ जळाला तरी पिळ कायम' या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे, असेही बावनकुळे (Maharashtra Politics)यांनी ठाकरेंवर टीका करताना म्हटले आहे.
२०१९ साली ज्यांनी भाजपसोबत गद्दारी केली त्यांनीच स्वतःच्या खुर्चीसाठी वडिलांच्या धोरणाला पायदळी तुडवलं. ते उद्धव ठाकरे खरे गद्दार आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेने आता ओळखलं आहे. म्हणून यांचा हा जळफळाट फार काळ टिकणार नाही. कारण येणाऱ्या राज्यातील निवडणुकीत जनता ठाकरे यांच्या उरलेल्या अहंकाराची लंका जाळून टाकेल, असेही चंद्रशेखर बावनकुळे (Maharashtra Politics) यांनी ठाकरेंवर टीका करताना म्हटले आहे.