नागपूर पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी ५० हजारांपेक्षा अधिक मुले देशभरात वाऱ्यावर सोडली जातात. शासनाने त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी कायदा करावा हाच माझा ध्यास आहे. हा कायदा होईल तेव्हाच मला खऱ्या अर्थाने पद्मश्री पुरस्काराचा खरा आनंद मिळेल असे प्रतिपादन पद्मश्रीने सन्मानित झालेले कर्मयोगी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर बाबा पापळकर यांनी केले. (Shankar Baba Papalkar)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नुकतेच पद्मश्रीने सन्मानित झालेले शंकर बाबा पापळकर नागपुरातील प्रेस क्लब येथे वार्तालाप कार्यक्रमात अनौपचारिक संवाद साधत होते. आपले काम कानाकोपऱ्यात पोहोचविणाऱ्या चौथा स्तंभाला हा सन्मान अर्पण करीत आहे असे स्पष्ट करताना त्यांनी आपल्याला अपेक्षित असलेल्या कायद्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिल्याचे एका प्रश्नाचे उत्तरात स्पष्ट केले. (Shankar Baba Papalkar)
बेवारस मुले १८ वर्षानंतर गुन्हेगारी क्षेत्रात ढकलली जातात. शासकीय योजना भरपूर असल्या तरी बहुतांशी योजना कागदावरच राहतात. १०० कोटींचे बजेट असताना युवकांच्या पुनर्वसनाची बोंब आहे. अनाथांना आधार कार्ड, मतदान ओळखपत्र देखील मिळत नाही अशी व्यथा मांडताना ते भावनिक झाले. प्रारंभी आदिवासी अप्पर विभागाचे आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी शंकरबाबा पापळकर हे आधारवड आहेत. विविध भागातून येणाऱ्या बेवारस दिव्यांगांचे शंकरबाबांनी पुनर्वसन केले त्यांना स्वाभिमान शिकवला. लग्न जुळवून अनेकांना समाजाचे मुख्य प्रवाहात आणल्याची भावना बोलून दाखवली. यावेळी नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी, अनिल गडेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
हेही वाचा