कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा होणार्या शिंगणापूर बंधार्याला मोठी गळती लागली आहे. (Kolhapur MNC) येत्या रविवार व सोमवारी (दि. 24 व 25) महापालिकेच्या वतीने गळती काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी, शिंगणापूर उपसा केंद्र बंद ठेवण्यात येणार असल्याने कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे. यात ए, बी, सी, डी व ई वॉर्ड आणि त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भागाचा समावेश आहे.
26 ऑक्टोबरला पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. सर्वच वॉर्डांतील नागरिकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी टँकरद्वारे पाणीवाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले.
शिंगणापूर बंधार्याला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे पाण्याचा उपसा योग्य प्रमाणात होत नाही. परिणामी, शहराला अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असतो. काही वर्षांपूर्वी महापालिकेने गळती काढण्यासाठी तात्पुरते प्रयत्न केले.
परंतु, त्यात यश आले नाही. पुन्हा गळती सुरू आहे. बंधार्यात पाणी थांबत नसल्याने उपसा करून शहराला पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत.