बंगळूर- निपाणी : कर्नाटकमधील काही हिंदू मंदिरांतून नित्यनेमाने होणार्या सलाम आरतीचे (Salaam Aarti ritual) नवे नामकरण करण्यात आले आहे. आता सलाम आरतीऐवजी नमस्कार आरती म्हणून ओळखले जाणार आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या मागणीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. टिपू सुलतानाच्या काळापासून सलाम आरती हे नाव चालत आले होते. या नावासह टिपू सुलतानाच्या नावाने केले जाणारे विधीही रद्दबातल ठरविण्याची मागणी या संघटनांनी राज्य सरकारकडे केली होती.
कर्नाटकताली हिंदू संघटनांच्या मागणीनंतर ३०० वर्षे जुनी परंपरा बदलण्यात आली आहे. १८ व्या शतकातील शासक टिपू सुलतानच्या काळापासून मंदिरांमध्ये 'सलाम आरती' सुरु होती. तिचे नाव आता बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता सलाम आरतीऐवजी 'नमस्कार आरती' म्हणून ओळखली जाणार आहे.
टिपू सुलतानच्या नावाने होणारे सर्व विधी बंद करण्याची मागणी हिंदू संघटनांनी राज्य सरकारकडे केली होती. त्यात सलाम आरतीचाही समावेश होता. कर्नाटकच्या धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्य धर्म परिषदेच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर परंपरेनुसार विधी सुरू राहतील, पण त्यांची नावे बदलण्यात आली आहेत.
राज्याच्या धर्मादाय खात्याच्या व्याप्तीत येणाऱ्या मंदिरांमध्ये प्रथा असलेल्या 'दिवटी सलाम', 'सलाम आरती' आणि 'सलाम मंगल 'आरती' या धार्मिक पूजाविधींची नावे बदलून हिंदू परंपरेप्रमाणे नाव देण्याबाबत व्यापक चर्चा झाली. या पूजांची नावे बदलून स्थानिक भाषेतील शब्द वापरण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली. टिपू सुलतान यांच्या काळापासून आरती व मंगल आरतीना सलाम हा शब्द वापरला जात होता. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कुक्के सुब्रह्मण्य, कोल्लर, पुत्तूर महालिंगेश्वर मंदिरांमध्ये ही प्रथा होती.
मंत्री जोल्ले म्हणाल्या, धर्मादाय खात्याच्या व्याप्तीतील धर्मादाय खात्याच्या ज्येष्ठ पंडितांच्या म्हणण्यानुसार मंदिरामध्ये यापुढे दिवटी सलामऐवजी दिवटीला नमस्कार, सलाम आरतीऐवजी आरती नमस्कार आणि सलाम मंगल आरतीऐवजी मंगलारती नमस्कार म्हणून नाव बदलून सेवाकार्य सुरू ठेवण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. सलाम हा शब्द काढून टाकला आहे.
आरती पूजा रद्द होणार नाही. केवळ दुसऱ्या भाषेतील शब्द बदलून आपल्या काही मंदिरामध्ये सकाळ, दुपार आणि सायंकाळच्यावेळी दिवा हातात घरून देवतेची आरती करणे याला दिवटी सलाम, सलाम मंगल आरती आणि सलाम आरती म्हटले जात होते. या नावांमध्ये बदल व्हावा, अशी भाविक व पुजारी वर्गातून मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर भाविकांकडून पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा आणि पूजा चालू ठेवण्यात येणार आहेत. कोणताही पूजाविधी रद्द केला जाणार नाही.
दुसरीकडे राज्य सरकारच्या या निर्णयावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. भाजपला आमचा इतिहास आणि जुनी संस्कृती बदलायची आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. (Salaam Aarti ritual)
हे ही वाचा :