पुढारी ऑनलाईन : जेव्हा देशात दिल्लीश्वरांचे राज्य होते, तेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने मराठी भूमीला 'स्वाभिमाना'ची जाणीव करून दिली. त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनीही आपल्या पित्याच्या स्वाभिमानाची परंपरा पुढे चालवली. महाराष्ट्र दिल्ली समोर कधीच झुकला नाही, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला सुनावले. बीडमध्ये राष्ट्रवादीच्या स्वाभिमान सभेत ते बाेलत हाेते.
या वेळी जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी सुडाचे राजकारण नाही, तर प्रेमाचे राजकारण केले. यामुळे आजही ते जनमानसात जिवंत आहेत; पण आज अनेकजण राजकीय स्वार्थापोटी सुडाचे राजकारण करत समाजात वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आराेपही त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरूगांत गेले. त्यांनी सुडाच्या राजकारणाविरोधी लढत देशातील युवकांपुढे वेगळा आदर्श घालून दिला आहे, असेही जयंत पाटील यांनी नमूद केले.
धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये शरद पवार यांच्या स्वागतासाठी पोस्टर्स लावले. त्यांना आजही शरद पवारांच्या आशिर्वादाची गरज असल्याचे ऐकूण बरे वाटले, असा टाेलाही त्यांनी लगावला.