पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वेदांता प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारला घेरले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात पाकिस्तान आहे का? असे वक्यव्य केले होते. या वक्तव्याचा आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्र पाकिस्तान आहे का? प्रकल्प गुजरातला पळवून लावला. महाराष्ट्राच्या मुलांनी काय चूक केली आहे, असा खरमरीत सवाल आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला केला आहे. आदित्य ठाकरे यांनी शनिवारी (दि.१७) थोर समाज सुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आदित्य ठाकरे म्हणाले, माझ्या पणजोबांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला. आज मराठवाडा मुक्तीसंग्रामदिन देखील आहे. आज (दि.१७) मी पेपरमध्ये वेदांता प्रकल्पाबाबत वाचले. हा प्रकल्प गुजरातला गेला याचे कोणालाही दुःख नाही, याची मला खंत वाटते. महाराष्ट्रासाठी कोणी काही बोलायला लागले की त्याच्यावर आरोप करायचे, त्याची बदनामी करायची त्याच्या चौकशीची मागणी करायची. महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणे हा आपल्या देशात गुन्हा झालाय का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.