पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना श्रीलंकेविरूध्द झाला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेला १५१ धावांचे आव्हान दिले. परंतु भारतीय गोलंदांजांनी केलेल्या तिखट माऱ्यापुढे श्रीलंकेचा संघ फार काही करू शकला नाही. भारताने श्रीलंकेला १०९ धावांवर ऑल आऊट करत सामना ४१ धावांनी जिंकला. हा सामना बांग्लादेशच्या सिल्हेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. (Women's Asia Cup)
दरम्यान, सामन्याच्या सुरूवातीला नाणेफेक जिंकत श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सलामीची जोडी फार काळ मैदानावर टिकू शकली नाही. श्रीलंकेची गोलंदाज कुमारीने भारताची फलंदाज स्मृती मानधानला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. स्मृती अवघ्या ६ धावा करून बाद झाली. संघात पुनरानमन कराणाऱ्या जेमिमाह रॉड्रिग्जने शानदार फलंदाजी करत ५३ चेंडूत ७६ धावा केल्या. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने केलेल्या ३३ धावांमुळे भारताने श्रीलंकेला विजयासाठी १५१ धावांचे आव्हान दिले. (Women's Asia Cup)
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या हर्षिता मडावी, हसिनी परेरा, ओशाडी रणसिंगे या फलंदाजांना वगळले तर इतर कोणत्याही फलंदाजाला धावांचा दुहेरी आकडा गाठता आला नाही. श्रीलंकेसाठी हसिनी परेरा हिने ३२ चेंडूत सर्वाधिक ३० धावा केल्या. भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यापुढे श्रीलंकेचा संघ फार धावा करू शकला नाही. श्रीलंके़चा संघ १०९ धावांत ऑल आऊट झाला. भारतीय संघाकडून दयालन हेमलता हिने २.२ षटकांत १५ धावा देत श्रीलंकेचे ३ गडी बाद केले. तिच्यासोबत भारताच्या सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत आशिया चषकातील पहिल्या सामन्यात विजयी सलामी दिली.
हेही वाचा;