पुढारी ऑनलाईन डेस्क : मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर एक लाख प्रेक्षकांच्या समोर खेळला गेलेला भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) हा हाय व्होल्टेज सामना 'न भूतो न भविष्यति' असाच पहायला मिळाला. या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत थरार पाहायला मिळाला. अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाच्या मदतीला विराट कोहली व हार्दिक पांड्या यांची जोडी धावून आली. या सामन्यात हार्दिकने एक विक्रम नोंदवला. आतापर्यंत एकाही भारतीयाला असा विक्रम करता आलेला नाही.
भारताची खराब सुरुवात
पाकिस्तानच्या १६० धावांच्या पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण केएल राहुल (४), रोहित शर्मा (४), सूर्यकुमार यादव (१५) व अक्षर पटेल (२) असे चार फलंदाज ३१ धावांवर माघारी परतले.
विराट कोहली व हार्दिक पांड्या ठरले विजयाचे शिल्पकार (IND vs PAK)
खराब सुरुवातीनंतर विराट कोहली व हार्दिक पांड्या या जोडीवरच आता टीम इंडियाची सर्व भिस्त होती. विराट आणि पांड्या यांनी एकहाती डाव सावरत एक तगडी भागिदारी उभारली. दोघांनी मिळून ११३ धावांची विक्रमी भागिदारी केली. या भागेदारीनंतर ४० धावा करून पांड्या बाद झाला. सामन्याचा सामनावीर विराट कोहलीने ५३ चेंडूत नाबाद ८२ धावांची खेळी केली आणि भारताला विजयश्री मिळवून दिला. विशेष म्हणजे भारताने टी २० सामन्यात पाकिस्तानविरुद्ध केलेली ही सर्वात मोठी भागिदारी ठरली.
हार्दिकने केली अष्टपैलू कामगिरी
या सामन्यादरम्यान हार्दिकने एक अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याने ट्वेंटी-२० सामन्यात १००० प्लस धावा व ५० प्लस विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी नोंदवली. ट्वेंटी-२० सामन्यात असा विक्रम करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. शाहिद आफ्रिदी, शाकिब अल हसन, ड्वेन ब्राव्हो, थिसारा परेरा, मोहम्मद हाफिज, मोहम्मद नबी, केव्हीन ओ'ब्रायन यांनी हा पराक्रम केला आहे.
शेवटच्या षटकात १६ धावांची गरज
भारताला शेवटच्या षटकात १६ धावांची गरज होती. विराटने नो बॉलवर षटकार ठोकला. यानंतर तो फ्री हिटवर बोल्ड झाला, पण त्यावरही त्याने ३ धावा केल्या. त्यानंतर दिनेश कार्तिक बाद झाला. २ चेंडूत २ धावा गरज हाेती. त्यानंतर नवाजने एक चेंडू वाईड टाकला. अखेरच्या चेंडूवर अश्विनने एक धाव घेत विजय मिळवून दिला. विराट कोहलीने नाबाद ८२ धावा केल्या.
हे हि वाचा…