पुढारी ऑनलाईन डेस्क : India vs Pakistan Asia Cup : आशिया कप स्पर्धेतील दोन सामने झाले आहेत. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा 238 धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बांगला देशला 5 गडी राखून मात दिली. आता तमाम क्रिकेट चाहत्यांच्या नजरा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे लागल्या आहेत. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कँडी येथे हा सामना खेळवला जाणार आहे.
पल्लेकेलेची खेळपट्टी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना बाऊन्स आणि स्विंग देऊ शकते. त्यानंतर खेळपट्टी फलंदाजीस अनुकुल राहते. दुसऱ्या डावात खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी होते. अशा स्थितीत धावांचा पाठलाग करणा-या संघाला संघाला फायदा होऊ शकतो. खेळपट्टी कोरडी असेल तर फिरकीपटू चमत्कार करू शकतात. दोन्ही संघांकडे चांगले फिरकीपटू आहेत, जे संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. पल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत 37 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 15 आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 21 सामने जिंकले आहेत. पल्लेकेलेच्या खेळपट्टी वर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 248 आणि दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या 201 आहे.
पल्लेकेले येथे श्रीलंकेच्या संघाने 1996 मध्ये केनियाविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या होत्या. तेव्हा श्रीलंकेने 398 धावांचा डोंगर रचला होता. या मैदानावरील सर्वात निच्चांकी धावासंख्या 70 आहे. हा लाजिरवाणा विक्रम झिम्बाब्वे संघाच्या नावावर आहे. या मैदानावर लसिथ मलिंगाच्या नावावर सर्वाधिक 24 विकेटची नोंद आहे. तर धावांच्या बाबतीत तिलकरत्ने दिलशान अव्वल स्थानी आहे. त्याने 15 डावात सर्वाधिक 939 धावा केल्या आहेत.
भारताने आतापर्यंत श्रीलंकेविरुद्ध पल्लेकेले येथे तीन सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन वेळा टीम इंडियाने विजय मिळवला आहे. टीम इंडियाची येथे सर्वोत्तम धावसंख्या 294 आहे, जी 2012 मध्ये बनली होती. (India vs Pakistan Asia Cup)