![India Population | चीनला मागे टाकून भारत बनला जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश- UN](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F04%2F222-2.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन : भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. याबाबतची आकडेवारी बुधवारी संयुक्त राष्ट्रांने प्रसिद्ध केली आहे. भारताची लोकसंख्या १.४२८ अब्जावर गेली आहे. जी चीनच्या १.४२५ अब्ज लोकसंख्येपेक्षा किंचित अधिक आहे, असे यूएनच्या जागतिक लोकसंख्या अहवालाच्या म्हटले आहे. याबाबतचे वृत्त ब्लूमबर्ग वृत्तसंस्थेने दिले आहे. (India Population)
UNFPA च्या ताज्या अहवालानुसार, भारतातील २५ टक्के लोकसंख्या ०-१४ वयोगटातील आहे. १८ टक्के लोकसंख्या १० ते १९ वयोगटातील आहे. २६ टक्के लोकसंख्या १० ते २४ वयोगटातील तर ६८ टक्के लोकसंख्या १५ ते ६४ वयोगटातील आहे. तर ६५ वर्षांवरील लोकसंख्येचे प्रमाण ७ टक्के आहे.
आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताची लोकसंख्या ही युरोप अथवा आफ्रिका अथवा अमेरिकेतील संपूर्ण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. भारताची लोकसंख्या २०५० पर्यंत १.६६८ अब्जांपर्यंत पोहोचेल आणि चीनची लोकसंख्या सुमारे १.३१७ अब्जांवर जाईल असा अंदाज आहे.
भारतातील निम्मी लोकसंख्या ३० वर्षांपेक्षा कमी वयाची आहे आणि यामुळे दरवर्षी लाखो लोक नोकरीच्या शोधात असतात. येत्या काही दशकांत विस्ताराची गती टिकवून ठेवण्याचे आणि वाढती बेरोजगारी कमी करण्याचे भारतासमोरील मोठे आव्हान आहे. अंदाजे ८.०४५ अब्ज जागतिक लोकसंख्येपैकी चीन आणि भारत या दोन्ही देशांचा वाटा एक तृतीयांशपेक्षा जास्त आहे. पण आता दोन्ही देशांतील लोकसंख्या वाढ मंदावली आहे.
हे ही वाचा :