![भारताच्या सलग सहा विकेट पडल्यानंतर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक मजेशीर टिप्पणी केली. यामुळे सर्वांना हसू आवरले नाही.](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F01%2FShastri.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ १५३ धावांत सर्वबाद झाला. चांगली सुरुवात करूनही टीम इंडियाला मोठी धावसंख्या करता आली नाही. एकवेळ भारताची धावसंख्या चार विकेटवर १५३ धावा होती. या धावसंख्येसह शेवटचे सहा फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. टीम इंडियाच्या खात्यात एकही धाव जमा झाली नाही. भारतीय संघाने 11 चेंडूत शून्य धावा आणि सहा विकेट गमावल्या. या वेळी समालोचन करत असलेले भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक मजेशीर टिप्पणी केली. त्यांच्या या टिप्पणीवर सर्वांनाच हसू आवरले नाही. ( IND Vs SA Test Ravi Shastri Commentary ) याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताची धावसंख्या ४ बाद १५३ अशी होती. विराट आणि केएल राहुल खेळत होते. आठ धावांवर खेळणार्या राहुलला लुंगी एनगिडीने यष्टिरक्षक काइल वेरेयनच्या हाती झेलबाद केले. यानंतर विकेट पडण्यास सुरुवात झाली. त्याच्यानंतर एनगिडीने रवींद्र जडेजा (0) आणि जसप्रीत बुमराह (0) यांना बाद केले. त्यानंतर विराट (46 धावा) रबाडाने स्लिपमध्ये एडन मार्करामकरवी झेलबाद झाला. मोहम्मद सिराज खाते न उघडताच धावबाद झाला. शेवटचा विकेट म्हणून प्रसिध कृष्णा (0) बाद झाला. रबाडाने त्याला बाद केले.
सहा विकेट्स शून्यावर पडल्यानंतर समालोचन करणारे रवी शास्त्री म्हणाले की, "१५३ धावांत चार विकेट आणि त्यानंतर १५३ धावांत सर्वबाद झाले." यादरम्यान कोणी टॉयलेटमध्ये जाऊन परतले असेल, तर मी तुम्हाला सांगतो की, भारतीय संघ 153 धावांवर ऑलआऊट झाला आहे. शास्त्री शेवटी म्हणाले, "किंवा कोणीतरी पाणी पिऊन परतले आहे ताेपर्यंत सहा विकेट गेल्या." त्यांच्या या टिपण्णीवर सारेच हसू लागले. त्यांची ही टिप्पणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हा व्हिडिओ माेठ्या प्रमावर शेअर हाेत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
तत्पूर्वी, मोहम्मद सिराजच्या (6/15) घातक गोलंदाजीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 23.2 षटकांत अवघ्या 55 धावांत गुंडाळले. भारताने आपल्या 91 वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येवर विरोधी संघाला बाद केले. याआधी भारतीय संघाने 2021 मध्ये मुंबई कसोटीत न्यूझीलंडला 62 धावांत गुंडाळले होते.
हेही वाचा :