पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना अवैध खाण प्रकरणात आज (दि. ७) सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. झारखंड उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी 'सत्यमेव जयते' असे ट्विट करून न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे.
हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या विरोधात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती ज्यात खाण लीजचे चुकीचे वाटप आणि शेल कंपन्यांमध्ये त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी गुंतवणूक केल्याचा आरोप केला होता. या याचिकेच्या वैधतेला झारखंड सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तथापि, झारखंडच्या उच्च न्यायालयाने या याचिका कायम ठेवण्यायोग्य मानल्या होत्या. त्यानंतर सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
मुख्य न्यायमूर्ती यू यू लळित, न्यायमूर्ती एसआर भट आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने 17 ऑगस्ट रोजी झारखंड सरकार आणि सोरेन यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल केलेल्या स्वतंत्र याचिकांवर निकाल राखून ठेवला होता. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला खाण लीज प्रकरणात सोरेन यांच्याविरुद्ध चौकशीची मागणी करणाऱ्या जनहित याचिकांवर कार्यवाही करण्यास मनाई केली होती.
हेही वाचलंत का ?