मुंबई, पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा म्हणण्याचे आव्हान देणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अटक करण्यात आली होती. त्यांना जामीन मिळाल्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान नवनीत राणा यांचा एमआरआय काढण्यात आला होता. याचे शुटींग समोर आल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. याबाबत रूग्णालयात जाऊन शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रशासनाला जाब विचारत आज (दि. ९) धारेवर धरले.
नवनीत राणा यांना स्पाँडिलायटीस झाल्याचे निदान करण्यात आले होते. त्यासाठी त्यांचा एमआरआय काढण्यात आला होता. दरम्यान, त्यांचा एमआरआय काढतानाचे शुटींग समोर आले आहे. यावरून पेडणेकर आणि कायंदे यांनी रूग्णालयाला जाब विचारत प्रश्नांची सरबत्ती केली. त्याचबरोबर एमआरआय काढणाऱ्या टीमची उलटत तपासणी यावेळी करण्यात आली.
नवनीत राणा यांना स्पाँडिलायटीस असताना त्यांनी उशी कशी वापरली ? रूग्णालयात शुटींगची परवानगी कशी काय दिली ? एमआरआय रूमपर्यंत कॅमेरा कसा काय पोहोचला ? असे प्रश्न प्रशासनाला विचारण्यात आले. राणा यांचा एमआरआय झाली की नाही, असा सवाल करत शिवसेनेने शंका उपस्थित केली. एमआरआय रिपोर्ट डॉक्टरांनी सादर करावा, असे आव्हानच प्रशासनाला देण्यात आले. रूग्णालयातील रूग्णांवरील उपचारांचे शुटीग कसे काय केले जाते. सेलेब्रिटींसाठी वेगळा नियम आहे का ? असा सवालही यावेळी करण्यात आला. रूग्णासोबत एका व्यक्तीला सोबत राहण्याची परवानगी असताना नवनीत राणा यांच्यासोबत चार जण कसे काय होते, असाही प्रश्न पेडणेकर आणि कायंदे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, पेडणेकर आणि कायंदे यांच्या प्रश्नावर रूग्णालय प्रशासन निरूत्तर झाले. त्यांना प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. रूग्णालय प्रशासनाला कुणी दबावात आणले होते का ? या सर्व प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही पोलिसांत तक्रार करणार असल्याचे मनिषा कायंदे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.
हेही वाचलंत का ?