नागीण : गैरसमज नकोत; उपाय हवेत!

नागीण : गैरसमज नकोत; उपाय हवेत!

डॉ. संजय गायकवाड :  नागिणीने विळखा मारला किंवा दोन तोंडे एकमेकांना जुळली की, जीवाला धोका असतो असा आपल्याकडे गैरसमज आहे. नागिणीवर औषध नाही, असेही अनेकांना वाटते. अशा गैरसमजांमुळे एकतर पेशंट घाबरतो किंवा घरच्या घरी उपचार करू लागतो. यामुळे बाकी काही नाही तरी नुकसान मात्र नक्की होते. त्यामुळे नागिणीसारख्या आजारांबाबत पुरेशी आणि शास्त्रीय माहिती मिळवणे व योग्य उपचार वेळ न घालवता करून घेणे हेच हिताचे ठरते.

ऋतुमानानुसार त्रासदायक ठरणार्‍या, प्रतिकारशक्ती कमी असेल तेव्हा वारंवार डोकं वर काढणार्‍या आजारांची पुरेशी माहिती आपल्यापाशी नसते असे सामान्यत: आढळते. जेव्हा अशा बदलत्या ऋतुमानानुसार नेहमी डोकं वर काढणार्‍या आजारांबद्दल माहिती नसते किंवा अर्धवट, अपुरी, अशास्त्रीय माहिती आपल्यापाशी असते तेव्हा त्या आजाराशी झुंजण्यात आपण कमी पडतो. याउलट जर पुरेशी आणि योग्य माहिती असेल तर योग्य उपचार वेळच्या वेळी मिळवणे सोपे जाते. वाढत्या तापमानात डोकं काढणार्‍या कांजिण्या व नागीण या आजाराविषयी अपुर्‍या माहितीपायी गैरसमजच अधिक आहेत.नागिणीने विळखा मारला की, जीवाला धोका असतो, हा त्यापैकी सर्वात मोठा गैरसमज. म्हणूनच असे गैरसमज दूर करून योग्य काळजी घेतल्यास नागिणीचा प्रसार कमी करण्यात मदत होईल.

सामान्यत: वाढत्या तापमानाबरोबर विविध साथीचे आजार पसरायला सुरुवात होते. विविध विषाणूजन्य अजार या ऋतूत जास्त प्रमाणात जाणवतात. लहान मुलांमध्ये होणार्‍या कांजिण्या आणि त्याच विषाणूंमुळे होणारी नागीण हे आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्या विषयीचे गैरसमज दूर करून योग्य ती काळजी घेतल्यास त्याचा प्रसार कमी करण्यास मदत होऊ शकते. लहानपणी ज्या व्यक्तींना कांजिण्या होतात, त्या रुग्णांमध्ये हे विषाणू मज्जारज्जूमध्ये सुप्त रूपात कायम वास्तव्य करतात. एकदा कांजिण्या झाल्यावर पुन्हा होत नाहीत. काही कारणाने आपली प्रतिकारशक्ती कमी झाली तर हे सुप्त असलेले विषाणू परत जागृत होतात आणि त्या व्यक्तीला नागीण होते असे दिसते. प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा असे आजार उद्भवतात.

सामान्यत: मानवी शरीरात प्रतिकारशक्ती कमी होण्याची अनेक कारणे आहेत. मधुमेह, प्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे (स्टिरॉइड्स, अवयवरोपणानंतर घ्यावी लागणारी औषधे, केमोथेरपीसाठी वापरली जाणारी औषधे इत्यादी.) एड्स या आजारात एकूणच शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने नागीण आजार उद्भवू शकतो. मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतरही काही वेळेला नागीण उद्भवते. अर्थात योग्य उपचाराने ती बरी होते, त्यामुळे विनाकारण कुठलेसे गैरसमज कवटाळून न बसता योग्य उपचार घेणे आणि लवकर बरे होणे हे महत्त्वाचे ठरते.

नागिणीवर औषध नाही, असा गैरसमज असल्यामुळे बर्‍याच वेळा रुग्ण इतर उपचार करू लागतो. घरच्या घरी दुर्वा, जळलेले खोबरे अथवा तांदूळ वाटून त्याचा लेप लावण्यात येतो. यामुळे आजार बरा होण्याऐवजी जखम चिघळून ते जास्त पसरतं आणि दुखणं लांबत जातं. नागीण होण्याची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. नागीण होण्याआधी काही वेळेला त्या भागामध्ये दुखायला लागते. त्वचा जास्त हुळहुळी होते आणि त्वचेची आग होते. या काळात पुरळ उठलेले नसल्याने रुग्णांची आणि काही वेळा डॉक्टरांची दिशाभूल होऊन विनाकारण तपासण्या केल्या जातात. हा त्रास छातीवर झाल्यास काही रुग्ण कार्डिओलॉजिस्टकडे जाऊन गरज नसताना खूप तपासण्या करून घेतात. नागिणीच्या दुखण्यात प्रचंड आग होते आणि ठराविक अंतराने चमका मारतात. दोन-तीन दिवसांनंतर लालसर रंगाचे पुरळ येते. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे फोड सुरुवातीला लालसर असतात. नंतर त्यात पाणी भरते. ज्या नसेवर हे फोड उमटतात, त्या ठिकाणी त्वचा लालसर होऊ शकते आणि फोडांचे समूह उठतात. दोन समूहांमधील त्वचा नेहमीसारखी असते.

नागिणीने विळखा मारला किंवा दोन तोंडे एकमेकांना जुळली की, जीवाला धोका असतो, असा आपल्याकडे गैरसमज आहे. या गोष्टीत काहीही तथ्य नाही. कारण नागीण ही शक्यतो शरीराच्या एकाच बाजूला येते. आजाराची तीव्रता प्रत्येक पेशंटच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते. काही वेळेला एकाच नसेला हा आजार होतो. इतर वेळेस दोन-तीन किंवा अधिक नसांना याची लागण होऊ शकते. वेळेवर योग्य उपचार सुरू केल्यास याचा त्रास लवकर कमी होऊन रुग्ण पूर्णपणे बरा होतो. नागीण बरी झाल्यावरसुद्धा काही व्यक्तींना त्या नसेच्या क्षेत्रात चमक मारणे, दुखणे असा त्रास होतो. पहिल्या 48 तासांत उपचार सुरू झाले तर हे टाळता येऊ शकते. खरोखरच पहिल्या 48 तासांच्या आत वैद्यकीय उपचार सुरू झाले तर औषधांच्या परिणामाद्वारे पाच-सात दिवसांत खपल्या येऊन आजार व्यवस्थित आटोक्यात येऊ शकतो. नागीण झाली असताना जास्त दगदग टाळावी, हलका आहार घ्यावा. आंघोळीनंतर ती जागा टिपून घ्यावी. स्वतःचे कपडे, साबण वेगळे ठेवावे. एवढी काळजी आवर्जून घेतली जायला हवी.

कांजिण्या काय आणि नागीण काय; योग्य वेळी योग्य उपचार हा हे आजार बरे करण्याचा मुख्य मंत्र आहे, पण अनेकजण 'बघू, होईल बरं' म्हणत राहतात किंवा घरगुती उपचार करण्यात वेळ घालवतात. ते टाळणेच योग्य! नागीण झाल्याचे लक्षात आल्यास त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपचार करून घ्यावे हे सर्वाधिक हिताचे ठरते. याच्या गोळ्या पूर्ण डोसमध्ये घेणे अतिशय गरजेचे असते. औषधांचे दुष्परिणाम होतील या भीतीने रुग्ण मनानेच अर्धवट मात्रा घेतात. तसे करणे योग्य नसते. गैरसमज दूर ठेवणे आणि डॉक्टरांनी सांगितल्यानुसार औषधांचा डोस पूर्ण करणे हेच पेशंटच्या आरोग्याच्या द़ृष्टीने हिताचे ठरते.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news