पुढारी ऑनलाईन: अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेला मान्सून अखेर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दाखल झाला आहे. रविवार, २५ जून राेजी मान्सूनने संपूर्ण राज्याला व्यापला असून, संपूर्ण देशातही मान्सून लवकरच पोहचेल असे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते. दरम्यान उद्यापासून मुंबई, ठाणे कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आज (दि.२६ जून) आयएमडी पुणेचे विभागप्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरून दिली आहे.
मान्सूनने राज्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार आणि मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी पश्चिम घाट पर्वतरांगा, कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या 'या' अंतर्गत भागात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे प्रादेशिक हवामान विभागाच्या (आयएमडी) मुंबईतील अधिकारी सुषमा नायर यांनी रविवारी सांगितले हाेते.
महाराष्ट्रातील पालघर, ठाणे आणि उत्तर महाराष्ट्रातील लगतचा भाग तसेच दक्षिण गुजरातचा काही भाग पुढील ३ ते ४ तासांत काही जोरदार पावसाच्या सरी कोसळणार असल्याची माहिती देखील डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. मुंबई, रत्नागिरी आणि राज्याच्या इतर भागांसह महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात येत्या दोन दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे देखील भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रविवारी सांगितले हाेते.