नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून (Eknath Shinde – Uddhav Thackeray) दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आता पुढील वर्षी १३ जानेवारीला सुनावणी घेण्यात येईल. सुनावणी दरम्यान न्यायालयाकडून याप्रकरणात महत्वाचे दिशानिर्देश दिले जाण्याची शक्यता आहे.
(Eknath Shinde – Uddhav Thackeray) यापूर्वी १ नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी.नरसिंहा यांचा समावेश असलेल्या घटनापीठाने सुनावणी घेत दोन्ही गटांना चार आठवड्यांमध्ये लिखित युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश दिले होते. दोन्ही गटांनी कुठले मुद्दे मांडण्यात येतील आणि कुठले वकील कोणत्या मुद्दयावर युक्तिवाद करतील, याची लिखित माहिती द्यावी, असे आदेश घटनापीठाने दिले होते.
२९ नोव्हेंबरला घटनापीठ याप्रकरणी सुनावणी घेणार होते, परंतु न्यायमूर्ती कृष्ण मुरारी हे रजेवर असल्याने सुनावणी लांबणीवर पडली होती. आज ( दि. ६) हे प्रकरण सुचीबद्ध करण्यात आले. २३ ऑगस्टला तत्कालीन सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हे प्रकरण पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे पाठवले होते. न्यायालयाने घटनापीठासमक्ष याचिकांना सुचीबद्ध करण्याचे आदेश दिले होते. आता तब्बल सव्वा महिन्यानंतर राज्यातील सत्तासंघर्षावर होणाऱ्या सुनावणीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचलंत का ?