![Hardik Pandya Ranking : हार्दिक पंड्याची टी20 अष्टपैलू रँकिंगमध्ये मोठी झेप!](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F08%2F21-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : Hardik Pandya Ranking : आशिया कपच्या सामन्यात पाकिस्तानची धुलाई केल्यानंतर भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याला सर्वात मोठा फायदा झाला आहे. टी 20 सामन्यांच्या कारकिर्दीत त्याने पहिल्यांदाच एका विशेष कामगिरीला गवसणी घातली आहे. हार्दिकने पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर 25 धावांत 3 बळी घेतले, त्यानंतर च्याने बॅटमधून वादळ घोंगावले. त्याने 17 चेंडूत नाबाद 33 धावा चोपत टीम इंडियाला 5 विकेट्सने सामना जिंकून दिला. या कामगिरीनंतर त्याने आयसीसीच्या ताज्या अष्टपैलूंच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
एकदिवसीय क्रमवारीत अव्वल 15 मध्ये हार्दिक हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. तर त्याने टी-20 अष्टपैलूंच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आणि आता तो 5 व्या स्थानावर पोहोचला आहे. पंड्याचे रेटिंग गुण 167 आहेत. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग आहे. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचे रेटिंग गुण 257 आहेत. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाचा धोकादायक फलंदाज आणि ऑफस्पिनर ग्लेन मॅक्सवेल पंड्याच्या पुढे आहे. दुसऱ्या क्रमांकावर बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन आहे, ज्याचे 245 रेटिंग गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा नवा कर्णधार मोईन अलीचे नाव असून त्याचे 221 रेटिंग गुण आहेत.
वनडेतील अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत शकीब अल हसन पहिल्या क्रमांकावर आहे, तर मोहम्मद नबी 325 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानच्या राशिद खानचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याचे 290 रेटिंग गुण आहेत. (Hardik Pandya Ranking)
टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत एकाही नव्या खेळाडूचा समावेश झालेला नसून, पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान बाबर आझमच्या जवळ आला आहे. भारताविरुद्ध 43 धावा करणारा सलामीवीर रिझवान दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानावर आहे. (Hardik Pandya Ranking)
हार्दिक पंड्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर हे वर्ष त्याच्यासाठी खूप चांगले ठरले आहे. पंड्याने दमदार पुनरागमन केले असून पहिल्यांदा त्याने गुजरात टायटन्स संघाला आयपीएल चॅम्पियन बनवले, त्यानंतर टीम इंडियाचे कर्णधारपदही भूषवले. खरे तर चार वर्षांपूर्वी आशिया चषक स्पर्धेदरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पांड्याला दुखापत झाली होती. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला स्ट्रेचरवर मैदानाबाहेर नेण्यात आले होते. त्या दुखापतीतून सावरण्यासाठी आणि जुनी लय परत मिळवण्यासाठी त्याला बराच वेळ लागला. पण पुनरागमन केल्यानंटर त्याने मैदानावर धुमाकूळ घातला आहे.
28 ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर 5 गडी राखून विजय मिळवला होता. पाकिस्तानने दिलेले 148 धावांचे लक्ष्य त्यांनी 19.4 षटकांत पाच गडी राखून पूर्ण केले. हार्दिक (33) व्यतिरिक्त विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने 35-35 धावा केल्या. भुवनेश्वर कुमार गोलंदाजीत यशस्वी ठरला. त्याने पाकिस्तनच्या चार फलंदाजांना माघारी धाडले.