![Biparjoy Cyclone](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F06%2F%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%AF-2.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन : पुढील काही तासांमध्ये 'बिपरजॉय' चक्रीवादळ हे जाखाऊ बंदरावर धडकणार असल्याची माहिती भारतीय आपत्ती व्यवस्थापन आणि गुजरात प्रशासनाकडून देण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात किनारपट्टीवरील ४५० हून अधिक गावांना अलर्ट जारी केला आहे. राज्यातील ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर तब्बल एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, गुजरात किनारपट्टीवरील माडवी, भूज आणि द्वारकात भागांत जोरदार वारा आणि मुसळधार पावसाची सुरूवात (Biparjoy Cyclone) झाली आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) गुजरातच्या किनार्याकडे सरकत असून, ते अतिशय धोकादायक रूप धारण करत आहे. सध्या हे चक्रीवादळ जखाऊपासून ११० किमी अंतरावर असून, कच्छच्या जखाऊ येथे आज सायंकाळी ६ ते ८ च्या दरम्यान धडकण्यास सुरूवात होईल आणि मध्यरात्रीपर्यंत धडकतच राहील. दरम्यान किनारपट्टीच्या भागात मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच या भागात पूर देखील येण्याची शक्यता असून, मोठ्या प्रमाणावर विध्वंस होणार असल्याचे आयएमडीचे संचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी वर्तवली असल्याचे एएनआयने सांगितले आहे.
गुजरातमधील द्वारका, जामनगर, पोरबंदर, मोरबी, राजकोट, जुनागढ, अमरेली, भावनगर, गिर सोमनाथ आणि कच्छ जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार तासांत मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस पडू शकतो, असे देखील हवामान खात्याने म्हटले आहे.